अनिल भाऊ यांच्या शिफारशीने तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात विसरू नका
विटा प्रतिनिधी
आमदार अनिल बाबर विकासाचे भगीरथ आहेत. केवळ विरोधासाठी विरोध बरोबर नाही. आमदार बाबर यांच्या विधानसभा विजयात खासदार संजय राऊत यांचे योगदान काय? असा परखड सवाल प्रकाश बागल यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर आमदार बाबर यांच्या शिफारशीने जिल्हाप्रमुख झालेल्या संजय विभूते यांनी पात्रता पाहून टीका करावी, असा इशारा बागल यांनी दिला.
खासदार संजय राऊत यांच्या विटा दौऱ्यानंतर विट्यात ठाकरे आणि आमदार अनिल बाबर समर्थकांत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या आरोपाला सोमवारी आमदार बाबर समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतिश निकम, प्रकाश बागल, किरण पाटील, शहर प्रमुख राजू जाधव, समीर कदम, माजी नगरसेवक अमर शितोळे, मिलिंद कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तालुकाप्रमुख सतिश निकम म्हणाले, आमदार अनिल बाबर यांच्या शिफारशीने तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात विसरू नका. त्यापूर्वी तुम्ही मनसेत गेला होता. त्यामुळे निष्ठेची भाषा तुम्हाला शोभत नाही. 2014 ला आमदार बाबर यांच्या शिफारने तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात. आपण एकत्र मिळून अनेक कामे केली. त्याला आमदार बाबर यांनी कायमच सहकार्य केले. मग आता अचानक केवळ राजकीय दोषापोटी आरोप करणे चुकीचे आहे. शहरप्रमुख राजू जाधव म्हणाले, आमदार अनिल बाबर आमचे नेते आहेत. त्यांच्यावर झालेली टीका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पटली नाही.
किरण पाटील म्हणाले, आमदार अनिल बाबर यांनी घरावर कर्ज काढून विकास कामे केली? असा आरोप करण्यात आला. पण कोणताही लोकप्रतीनिधी असो, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातूनच विकास कामे करत असतात. आमदारांच्या दारात विरोधक सुद्धा निधड्या छातीने येत असताना आमदारांनी कधीही विचारले नाही तू कोणत्या पक्षाचा? महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आणनारे आमदार आहेत. उठायचे सुटायचे टीका करायची हा धंदा विरोधकांनी बंद केला पाहिजे.
यावेळी समीर कदम म्हणाले, आमदार बाबर यांच्यावर टीका करण्यासाठी स्वतःची पात्रता पाहणे गरजेचे आहे. आमदार बाबर यांच्यामुळे आजचा शेतकरी अभिमानाने जगत आहे. उसने अवसान आणून टीका करणे हे योग्य नाही. तुम्ही कोणताही नेता विट्यात आणा. तुम्ही तुमच्या पक्षावर बोला, परंतु जर अनिल भाऊ वर कोणताही अपशब्द वापरला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ