संजय राउत कोल्हापूर दौऱ्यावर असताना हे विधीमंडळ नाही तर चोरमंडळ असल्याचे विधान केल्याने राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर विधानसभेत सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले असून त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी हि मागणी उचलून धरली आहे. ही हक्कभंगाची कारवाईची मागणी भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली असल्याचे सांगीतले जात आहे.
हेही वाचा >>>> डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘हे विधिमंडळ नसून चोर मंडळ आहे’ असा शब्द प्रयोग केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ही बनावट शिवसेना आहे….ड्युप्लिकेट. हे चोरांचं मंडळ आहे…चोर मंडळ. हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे….त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे….आम्ही पक्षातच राहणार आहोत…अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो” असा हल्ला करून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाला डिवचले आहे.
संजय राऊत यांच्या विधानावर विधानसभेत आक्षेप घेण्यात येऊन त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संजय राउत यांच्या विधानावर आशिष शेलार यांनी या मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधले. “संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान केला असून हा महाराष्ट्र द्रोह आहे. या सभागृहात दाऊद आहे का? इथे बसलेल्यांना चोर म्हणणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
त्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत हे भरकटले असून वैफल्यग्रस्त झाले असल्याचे म्हटले आहे. ते रोज आपल्या डिक्शनरीतून रोज नविन शब्द काढून बोलत आहेत. आता आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग करण्याची मागणी करत आहोत” असे गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.