वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा बेळगावऐवजी धारवाडमधून
बेळगाव : बेळगावमधून सुरू असलेल्या सेवा हुबळी येथे पळविण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे बेळगाववर वारंवार अन्याय होत आहे. बेळगावमधून सुरळीतपणे सुरू असलेल्या विमानसेवा हुबळी येथे पळविल्यानंतर आता वंदे भारत एक्स्प्रेसही बेळगावऐवजी धारवाडला घेऊन जाण्यात आली आहे. या सर्व प्रकारांमुळे बेळगावमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अजून किती दिवस बेळगाववर अन्याय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगाव-बेंगळूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. यासाठी विद्युतीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्यात येत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावमधून सुरू झाल्यास येथील प्रवाशांनाही कमी वेळेत बेंगळूरपर्यंतचा प्रवास करता येणार होता. तसेच बेंगळूरमधील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोव्याचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे ते रस्तामार्गाने गोवा गाठतात. मात्र, मध्येच घडणाऱ्या अपघातात बऱ्याच जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वेने बेंगळूरहून लोंढ्याला येऊन गोवा गाठणे सोयीचे झाले असते.
नुकतीच केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर जोशी यांनी धारवाड-बेंगळूर या मार्गावर जुलैपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे जाहीर केले. यामुळे बेळगावमधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणेच बेळगावला वंदे भारत एक्स्प्रेसपासूनही वगळण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी तयारी केली जात असताना अचानक निर्णय का बदलला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी बेळगावमधून सुस्थितीत सुरू असलेल्या विमानसेवा हुबळीला वळविण्यात आल्या. त्यावेळीही प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. तसेच इतर महत्त्वाचे प्रकल्पही हुबळीला पळविण्यात आले. महत्त्वाच्या खासगी कंपन्या, आयआयटी, औद्योगिक प्रकल्प हुबळीला वळविण्यात आले. यामुळे बेळगावच्या विकासाला खो बसला आहे. त्यातच आता वंदे भारत एक्स्प्रेसही धारवाड-बेंगळूर यादरम्यान धावणार असल्याने बेळगावचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत फटका?
बेळगावची विमानसेवा पळविल्यानंतर आता रेल्वेसेवांवर धाड टाकण्यात येत आहे. बेळगावहून पुणे किंवा मुंबईला जाण्यासाठी व खास बेळगावातून सुटणारी एकही एक्स्प्रेस नाही. बेळगाव-पुणे मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेसची कार्यवाहीसुद्धा अर्ध्यावरच सोडून देण्यात आली आहे. त्यातच आता वंदे भारत एक्स्प्रेसही धारवाडला पळविल्यामुळे बेळगावकरांच्या मनात प्रचंड असंतोष पसरला आहे. याचा फटका पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसणार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.