लुधियानातील ईश्वरदास आणि हुकूमचंद या दोन मित्रांची ही यशस्वी कहाणी आहे. तब्बल 25 वर्षे या मित्रांनी भाजी विकण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर काही नवे करावे, या ध्येयाने त्यांना भारले. त्यांनी धूप आणि उदबत्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. भारतीय संस्कृतीत धूप आणि उदबत्ती किंवा अगरबत्ती यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात या दोन वस्तू अनिवार्य असतात. त्यामुळे बाजारपेठ कमी पडणार नाही, याची या मित्रांना खात्री होती.
उदबत्ती आणि धूप शुद्ध नैसर्गिक सामग्रीपासून बनविला असेल तर तो अधिक लोकप्रिय होतो. तसेच त्याच्या धुराचा शरीराला कोणताही त्रास होत नाही. नैसर्गिक पदार्थांऐवजी रासायनिक पदार्थ वापरल्यास त्याच्या धुरामुळे डोळे चुरचुरणे किंवा घशात खवखवणे असे दुष्परिणाम दिसतात. त्यामुळे या मित्रांनी शुद्ध नैसर्गिक साधनसामग्रीपासून बनविलेल्या उदबत्त्या आणि धूप विकण्यावर भर दिला.
कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे उत्कृष्ट धूप आणि उदबत्तीची साधनसामग्री मिळते, असा लौकिक आहे. त्यामुळे तेथे उदबत्त्या तयार करून त्या पंजाबच्या लुधियाना शहरात तसेच आसपासच्या बाजारपेठांमध्ये विकण्यास त्यांनी प्रारंभ केला. अल्पावधीतच या उपक्रमाला मोठी लोकप्रियता मिळाली. आता पंजाबरोबरच दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तरप्रदेश इत्यादी आसपासच्या राज्यातील शहरांमध्येही त्यांनी व्यवसाय विस्तार केला आहे. त्यांच्या या व्यवसायालाही आता 50 वर्षांचा कालावधी लोटला आहे. हा व्यवसाय आता त्यांच्या पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या उदबत्त्या आणि धूप विदेशांमध्येही पोहोचत असून तेथील लोक कुरियरद्वारे ही उत्पादने मागवून घेतात. अशा प्रकारे हा नवीन प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. त्याचबरोबर गाईच्या शेणापासून तयार केलेले विशेष प्रकारचे पेलेही विकण्याचा उपक्रम त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी सुरू केला आहे.