ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘अग्निपथ’ (agneepath) योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. या वर्षी डिसेंबरपर्यंत लष्कराला पहिला अग्निवीर मिळेल आणि पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ते तिन्ही सेवांमध्ये ऑपरेशनल आणि नॉन-ऑपरेशनल तैनातीसाठी तैनात केले जातील, अशी माहिती भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे (Manoj Pande Chief of Army Staff of the Indian Army) यांनी शुक्रवारी दिली. तसेच देशातील तरुणांनी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
एका वृत्त संस्थेशी बोलताना जनरल पांडे म्हणाले , “अग्निपथ योजनेअंतर्गत घेतलेला निर्णय आमच्या अनेक तरुण, उत्साही आणि देशभक्त तरुणांना संधी देईल, जे युवक कोविड महामारी असूनही, सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करत होते, जी कोविड निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत पूर्ण होऊ शकली नाही. त्या युवकांना याचा लाभ होणार आहे”
२ दिवसात भरती प्रक्रिया सुरू होणार
पुढे बोलताना लष्कर प्रमुख जनरल पांडे म्हणाले, “पुढील २ दिवसात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात http://joinindianarmy.nic.in वर अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर तपशीलवार सैन्य भरती वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. पहिला अग्निवीर डिसेंबर (2022) पर्यंत आमच्या रेजिमेंटल केंद्रांमध्ये सामील होईल आणि पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ते आमच्या ऑपरेशनल आणि नॉन-ऑपरेशनलमध्ये तैनातीसाठी उपलब्ध असतील,” असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.
१४ जून रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ भरती योजनेवर बिहार आणि तेलंगणामध्ये झालेल्या हिंसक निषेधादरम्यान जनरल पांडे यांनी तरुणांना शांततेचं आवाहन केले आहे. आंदोलनाबाबत बोलताना जनरल पांडे म्हणाले, “मला वाटते की, तरुणांना अग्निपथ योजनेची सर्व योग्य माहिती नाही. त्यांना एकदा या योजनेची माहिती मिळाली की, त्यांना विश्वास वाटेल. सर्वांसाठी ही योजना फायदेशीर आहे.”
या योजनेचे उद्दिष्ट लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांसाठी पेन्शन लाभाशिवाय करारावर भरती करण्यात येणार आहे. देशासमोरील भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी अग्निपथ योजनेअंतर्गत तंदुरुस्त आणि तरुण सैनिक सामील करून घेतले जातील, असे सरकारने म्हटले आहे.