‘मला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे, दहावीनंतर डिप्लोमा करू की बारावीनंतर डिग्री?’ असा प्रश्न अनेक तालुक्यामधील गावातल्या मुला-मुलींकडून नेहमी विचारला जातो. घरातील पार्श्वभूमी समजून घेतल्यावर समजते की त्यांचे शेत असते किंवा त्यांचे आई-वडील इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. पिके कशी लावावीत, कांद्याच्या पिकाला किती वेळ लागतो, ऊस लावल्यानंतर तोडण्यासाठी केव्हा तयार होतो, उसाला पाणी किती लागते, गहू-ज्वारी-बाजरी यासारखी पिके उसाच्याच शेतीत घेऊ शकतो की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गावातील मुलांना माहिती असतात. आसपासच्या वातावरणामुळे अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना पुस्तकात शोधावी लागत नाहीत किंवा तोंडपाठ करावी लागत नाहीत. त्यामुळे गावातील मुलांनी करियर करायचे असल्यास शेती संबंधित उद्योगामध्ये करणे योग्य ठरते परंतु गावातील शेतकरी-शेत मजुरांच्या मुलांना शेती करण्याची इच्छा नसते. याची कारणे अनेक आहेत.
अनेक शेतकरी-शेत मजूर घरामध्ये शेतीविषयी तक्रार करत असतात. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे पिकावर आणि पिकापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत असतो. त्यामुळे शेती करणे हा अनिश्चिततेचा उद्योग आहे असे ठाम मत अनेक गावकऱ्यांचे असते. हे मत घरामध्ये वारंवार ऐकल्यामुळे शेतीमध्ये पैसा नाही यावर अनेक मुले-युवक ठाम असतात. दुसरे कारण, आई-वडील ज्या व्यवसायात नोकरीत असतात त्या क्षेत्रामध्ये करियर करण्यास नाखूष असणाऱ्या पाल्यांचे प्रमाण शहर आणि गावामध्ये वाढते असते. तिसरे कारण, गावातील मुला-मुलींना असणारे शहराचे आकर्षण. ‘करियर कुठे करणार?’ असा प्रश्न विचारल्यावर बरीच मुले-मुली जवळच्या शहराची नावे सांगतात. छोट्या गावामध्ये दरमहा 15000 रुपये उत्पन्न मिळाले तरी त्यावर महिन्याचा खर्च होऊन शिवाय काही रक्कम शिल्लक राहते. परंतु पुणे-मुंबईसारख्या शहरात दरमहा 30,000 रुपये मिळाले तरीही कमीच पडतात. घरभाड्यापासून रोजच्या जेवणाचा खर्च शहरामध्ये दुप्पट असतो. शिवाय शहरामध्ये सढळ हाताने खर्च करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. चौथे कारण, पिढ्यान पिढ्या शेती करणाऱ्यांमध्ये नवीन पद्धतीने शेती करण्याची वृत्ती अभावाने आढळते. ‘आम्हाला इतके वर्षे शेती करण्याचा अनुभव आहे, तू शेती शिकून काय मोठे दिवे लावणार आहेस?’ अशी वाक्ये मुलांच्या कानावर लहानपणापासून पडलेली असतात. पाचवे कारण, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची निकड जितकी शहरामध्ये जाणवते तितकी गावामध्ये नसते. त्यामुळे वेगळ्या तंत्राने शेती करणे, यालाच अनेक शेतकऱ्यांचा विरोध असतो.
एकूणच या परिस्थितीमध्ये वाढलेली मुले शेतीचे शिक्षण घेण्यास नाखूष असतात. या मुलांनी कॉम्प्युटरमध्ये शिक्षण घेतल्यामुळे परिणाम उलटा होतो. ज्याचे ज्ञान आहे, त्याचे शिक्षण न घेता ज्याची जुजबी माहिती नाही त्याचा अभ्यास करावा लागल्यामुळे अभ्यासाचे ओझे बनते. यावर उपाय म्हणून गावातील अनेक युवक-युवती यांना शेतीविषयक इंजिनिअरिंग करण्याचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.
अलीकडेच दापोलीच्या कृषी महाविद्यालयाला भेट दिली असता शेतीविषयक अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे जाणवले. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये बी.एससी. (अॅग्री), बी.एससी. (हॉर्टीकल्चर), बी.टेक (अॅग्री इंजिनिअरिंग), बी.एससी. (फॉरेस्ट्री) असे चार वर्षाचे कोर्स उपलब्ध आहेत. याच विषयात पुढील दोन वर्षामध्ये एम.एससी., एम. टेक करता येते. तीन वर्षामध्ये पी.एचडी. मिळवून डॉक्टरेट घेता येते. दापोलीमधील महाविद्यालयाच्या आवारामध्ये शेतीविषयक संशोधन केंद्राला भेट दिल्यावर कलम करण्याचे विविध प्रकार समजून घेता आले. आंब्याच्या विविध जाती, पेरू, विविध फळांच्या झाडांची कलमे अनेक प्रकारांनी कशी केली जातात याचे प्रात्यक्षिक शेतामध्ये बघितले. कलमे लावून अनेक रोपे इथे तयार करून दिली जातात, त्याचे प्रशिक्षण दिले जाते. वेलदोडे, लवंग, दालचिनी, जायफळ यासारख्या मसाल्यांची शेती दापोलीमध्ये कशी करता येते याचे अप्रूप वाटले. यावर उत्तर देताना तेथे शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चार बाजूला ठराविक अंतरावर नारळाची झाडे लावून त्याच्या सावलीमध्ये मसाल्याची रोपे कशी लावली जातात याबद्दल माहिती दिली. हळदीची रोपे लावून त्यापासून हळद पावडर कशी तयार केली जाते याचे प्रात्यक्षिक बघता आले. झिरो बजेट फार्मिंग, कमीत कमी जंतुनाशकांचा वापर करून शेती, व्हर्टीकल फार्मिंग, ऑरगॅनिक आणि त्याचे मार्केटिंग असे विविध प्रकार समजून घेऊन शेती केल्यास महाराष्ट्रातील शेतीचे चित्र बदलू शकते. वर्षानुवर्षे एका जमिनीमध्ये एकच पीक घेण्यापेक्षा वेगवेगळी पिके एकाच वेळी आणि आलटून पालटून कशी घ्यावीत तसेच शेतीमध्ये पैसा कसा आणता येतो याबद्दल तेथील सर्वच कर्मचारी, प्रशिक्षक आणि विद्यार्थी सकारात्मक बोलत होते. शेती विषयक इतके सकारात्मक वातावरण बघण्यासाठी दापोलीच्या कृषी विद्यापीठात भेट द्यायलाच हवी. अर्थात, महाराष्ट्रात शेतीविषयक शिक्षणासाठी अनेक महाविद्यालये आहेत त्याविषयी तौलनिक अभ्यास करून कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेता येईल याचा विचार करून कुठे प्रवेश घ्यावा याविषयी निर्णय घेता येईल.
तालुक्याच्या गावातील विद्यार्थ्यांप्रमाणेच शहरातील विद्यार्थीसुद्धा शेतीविषयक पदवी घेण्याचा विचार करू शकतात. त्यासाठी झाडे-प्राणी-पक्षी आणि एकूणच निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपण आजूबाजूला झाडे बघतो. पण त्या झाडांची नावे मात्र सांगता येत नाहीत. पक्ष्यांमध्ये काळे कावळे आणि पांढरे बगळे इतके ज्ञान असणाऱ्यांकडून झाडांबद्दल माहिती देण्या-घेण्याचे कष्ट सहसा घेतले जात नाहीत. वडाची झाडे पारंब्यांमुळे ओळखू शकतो. याउलट काही जण झाडाच्या पानांचा आकार, त्यावरील रेषा, लांबी-रुंदी बघून ते झाड कशाचे आहे हे ओळखू शकतात. याची माहिती खरे तर शालेय जीवनात देणे-घेणे आवश्यक आहे. झाडांची माहिती मिळाल्यास त्यावर कोणते पक्षी बसतात, कोणते पक्षी त्या झाडावर घरटे करतात यासंबंधी माहिती मिळू शकते. शालेय जीवनात जीवशास्त्र हा विषय पुस्तकाबाहेरचे जग बघून शिकायला हवा.
शहरातील पालकांनी पाल्याला शाळेत दाखल केल्यानंतर तत्परतेने काही रोपे घरामध्ये असलेल्या उपलब्ध जागेमध्ये लावावी आणि त्या रोपांची मशागत करताना पालकांनी आपल्या पाल्याला बरोबर घ्यावे. अन्यथा ही मुले मोठी झाल्यावर सर्व रोपांना रोज तांब्याभर पाणी घालतात आणि ती झाडे मान टाकतात. काही रोपे सावलीत वाढवायची असतात, काही रोपे थोड्या उन्हात ठेवायची असतात तर काही फुलांच्या झाडांना जितके ऊन द्याल, तितके उत्तम. काही रोपांना रोज तर काही रोपांना चार दिवसातून एकदा वाटीभर पाणी द्यायचे असते. काही झाडांना किड लागण्याची शक्यता कमी असते तर काही झाडांना पांढऱ्या रंगाची किड लागते जी दररोज पानांवर पाण्याचा फवारा मारल्यास निघून जाते. काही झाडांना किटकनाशकांचा भडीमार करण्यापेक्षा हळद, दालचिनी अथवा चिमुटभर तंबाखू घालून उकळलेले पाणी घातले तरी चालते. घरामध्ये लावलेल्या रोपांवर रोज लक्ष ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्राची गोडी लागते आणि त्या पुस्तकातील धड्यांखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना पाठ करावी लागत नाहीत.
सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये उसापासून साखर कशी तयार करतात याची प्रक्रिया सचित्र दर्शवली आहे. परंतु शहरातील वा खेडेगावातील सातवी-आठवीत शिकणारी मुले-मुली उसाच्या रसापासून साखर किंवा गुळ कसा तयार करतात, या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत. याचे कारण सातत्याने प्रश्न विचारणाऱ्या मनोवृत्तीचा अभाव. काही शेतकऱ्यांची मुले-मुली ऊस कसा लावतात आणि त्याची कापणी करून तो साखर कारखान्याला कसा पाठवतात, हे सांगू शकतात. परंतु उसाच्या रसापासून साखर किंवा गुळ कसा करतात, त्याची नेमकी प्रक्रिया काय याबद्दल प्रश्न विचारण्याची त्यांची तयारी नसते. शेतीमालावरील प्रक्रिया हा अभ्यासाचा विषय बनवता येतो. शेती आणि त्यामधून आलेल्या पिकावर पुढील प्रक्रिया काय करता येते, कशी करता येते यासाठी बारामती, नाशिक, दापोली यासारख्या ठिकाणी भेट देऊन त्याबद्दल शालेय जीवनात माहिती दिल्या-घेतल्यास फूड टेक्नॉलॉजी सारख्या विषयात इंजिनिअरींग करता येते. शेतीविषयक इंजिनिअरिंगमध्ये इरिगेशन, डेअरी मॅनेजमेंट, पोल्ट्री फिश प्रोसेसिंग, अॅग्रीकल्चर वेस्ट मॅनेजमेंट असे अनेक पर्याय शेतीविषयक इंजिनिअरिंगमध्ये आहेत. या शिक्षणासाठी दापोली व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सांगली, कराड, परभणी, नाशिक, भुसावळ, पुणे असे अनेक पर्याय महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.
अनिश्चितता प्रत्येक क्षेत्रात आहे. शेतीच्या शिक्षणाला नाविन्यपूर्ण प्रयोगाची जोड देऊन शेतीविषयक चित्र बदलणारे युवक महाराष्ट्राला हवे आहेत.
सुहास किर्लोस्कर