काचिन फुटीरवादी गटाचा आरोप
रंगून / वृत्तसंस्था
भारताचा शेजारी असलेल्या म्यानमार देशात लष्कराने केलेल्या वायुहल्ल्यात 60 नागरिकांचा बळी गेला आहे. हे नागरीक एका संगीतसभेला उपस्थित होते. ही संगीत सभा फुटीरवादी काचिन गटाने आयोजित केली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. हा हल्ला हेतुपुरस्सर केल्या असल्याचा आरोप या गटाने केला आहे.
म्यानमार देशातील हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी अग्नेय अशियातील देशांच्या विदेश व्यवहार मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीपूर्वी 3 दिवस हा हल्ला सोमवारी करण्यात आला. या हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या नेमकी किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र किमान 60 जण मृत्यूमुखी पडले असावेत, असे अनुमान आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत या देशाचा ताबा तेथील लष्कराने घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा लष्करी हल्ला असून मृतांची संख्याही एका दिवसातील सर्वाधिक आहे. अद्याप या हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. संगीत सभेच्या स्थानी या हल्ल्यामुळे प्रचंड नासधूस झाली असून अनेक नागरीकांनी या स्थानाची व्हिडीओग्राफी पोस्ट केली आहे.
म्यानमार देशातील अनेक अल्पसंख्य समुदाय स्वायत्ततेची मागणी करीत आहेत. पण गेल्यावर्षी या देशाचे सरकार उलथवून लष्कराने देशाचा ताबा घेतल्यानंतर या लष्करशाहीला मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. सरकारनेही विरोध करणाऱयांविरोधात हिंसाचाराचा अवलंब केला आहे. लष्कराने देशाची सत्ता हाती घेतल्यापासून आतापर्यंत 2,300 हून अधिक नागरीकांच्या हत्या केल्या आहेत, तर 15 हजारांहून अधिक लोकांना कारागृहात डांबण्यात आले आहे.
काचिन स्वातंत्र्य चळवळीचा कार्यक्रम
काचिन या समाजघटकाने गेल्या सहा दशकांहून अधिक काळापासून स्वातंत्र्याची चवळव हाती घेतली आहे. या चळवळीच्या 62 व्या प्रारंभदिनानिमित्त या संगीतसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी अनुमती देण्यात आली होती, असा आयोजकांचा दावा आहे. सरकारने अद्याप या संपूर्ण घटनेवर भाष्य केलेले नाही. तसेच सरकारी मिडियानेही या वृत्ताकडे दुर्लक्ष केलेले आहे.