ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नगराध्यक्ष आणि सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याच्या निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे. जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा, असा घणाघात अजित पवार यांनी शिंदे सरकारवर केला.
बारामतीत आज अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याची मंत्रीमंडळाला खूप घाई झालेली दिसते. थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीमुळे राज्यातील काही ठिकाणी नगराध्यक्ष आणि सरपंच वेगळय़ा विचारांचे आणि खालील सदस्य वेगळय़ा विचारांचे असं होतं. त्यावेळी नगराध्यक्ष इतर नगरसेवकांना विचारात घेत नाही. कोण्या एकाच व्यक्तीकडे तेथील सत्ता केंद्रित होते, जे लोकशाहीला मारक ठरते. याचा अनुभव या पूर्वी घेतला आहे.
अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाही घातक आहे. ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे असेच लोक निवडणूक जिंकू शकतात. लोकशाही मध्ये काही परंपरा असतात. 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते, बहुमत ज्या पक्षाला असते त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात, राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात त्याच पध्दतीने याही निवडी होत होत्या, तशाच पध्दतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते तर बरे झाले असते, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडे प्रचंड वैचारिक दिवाळखोरी