महिला, नागरिकांना नाहक त्रास, बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव येथील चावडी परिसरात काही दिवसांपासून मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्यावेळी येथे मद्यपी बसत असून, त्याचा नाहक त्रास महिला व नागरिकांना होत आहे. पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे असे प्रकार घडत असल्याने बंदोबस्ताची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सदर परिसरात सायंकाळनंतर वर्दळ कमी असल्याने मद्यपींचे फावले आहे. चावडी कार्यालयाच्या कट्टय़ावर बसून दारू ढोसण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळी तर दोन गटांमध्ये हाणामारी, शिव्या देण्याचे प्रकार होत आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. दारूच्या बाटल्या परिसरातच फोडत असल्यामुळे चावडीमध्ये कामासाठी जाणाऱया नागरिकांना या काचा लागत आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणात कचराही केला जात आहे. अशा प्रकारांना वेळीच आवर घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
यरमाळ रोडवर गस्तीची गरज
बाळकृष्णनगरपासून अवचारहट्टी गावापर्यंत रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. याचाच फायदा तळीरामांना होत आहे. मद्याच्या बाटल्या घेऊन मद्यपी रस्त्यामध्येच धिंगाणा घालत आहेत. यामुळे ये-जा करणारे शेतकरी तसेच नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी तर येणे-जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे यरमाळ रोडवर पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी केली जात आहे.