उष्णतेशी संबंधित आजार वाढण्याची भीती ः केंद्राचे राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांना पत्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात आता उष्णता वाढू लागली असून तापमानात हळूहळू वाढ होत आहे. याचदरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी उष्णतेशी निगडित आजारांवरून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ‘नॅशनल ऍक्शन प्लॅन’वर लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
देशात काही ठिकाणी तापमान यापूर्वीच उच्च स्तरावर पोहोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेमुळे होणारे आजार देखील आता वाढू लागणार आहेत असे म्हणत केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. 1 मार्च 2023 पासून सर्व राज्ये आणि जिल्हय़ांमध्ये हवामान बदल आणि मानवी आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमाच्या (एनपीसीसीएचएच) अंतर्गत उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन देखरेख एकीकृत आरोग्य सूचना मंचाच्या (आयएचआयपी) माध्यमातून केली जाणार असल्याचे केंद्र सरकारने राज्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
एनपीसीसीएचएच, एनसीडीसी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून राज्यांना पाठविण्यात आलेल्या या पत्रात उष्णतेच्या लाटेच्या पूर्वानुमानाचा संकेत देण्यात आला आहे. सर्व राज्यांमधील जिल्हा आणि शहराच्या आरोग्य विभागाला उष्णतेशी संबंधित आरोग्य कार्य योजना पुन्हा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर राज्याच्या आरोग्य विभागांना वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, तळागाळातील आरोग्य कार्यकर्त्यांना उष्णतेमुळे होणारे आजार, ते लवकर ओळखून उपाययोजना राबविण्याची क्षमता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
आरोग्य विभागाला सर्व आवश्यक औषधे, इंट्रावेनस फ्लूड, आइस पॅक, ओआरएस आणि सर्व आवश्यक सामग्रीची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य सुविधा तयारींची समीक्षा करत सर्व आरोग्य केंद्रांवर पेयजलाची व्यवस्था करण्याचा निर्देश केंद सरकारकडून देण्यात आला आहे.
मार्चपासून मेपर्यंत उष्णतेची लाट राहण्याचा अनुमान हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काय करावे हे सांगण्यात आले आहे.
पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा
तहान जाणवत नसली तरीही शक्य तितके पाणी पित रहावे. उष्माघातापासून वाचण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस), लिंबूपाणी, लस्सी, फळांचा रस घ्यावा असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
उन्हात जाणे टाळा
लोकांनी उन्हाळय़ात सैल आणि सौम्य रंगाचे सूती वस्त्र परिधान करावे. उन्हापासून वाचण्यासाठी छत्रीचा वापर किंवा टोपी परिधान करावी. लोकांनी स्वतःच्या भागातील हवामान जाणून घेण्यासाठी टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रांची मदत घ्यावी. तसेच भारतीय हवामान विभागाचे संकेतस्थळ किंवा सोशल मीडिया हँडल्सचा आधार घ्यावा अशी सूचना केंद्र सरकारने लोकांना केली आहे.
उष्माघाताचा धोका कुणाला सर्वाधिक?
लहान मुले अन् किशोरवयीन
गरोदर महिला
उघडय़ावर काम करणारे लोक
मानसिक रुग्ण
शारीरिकदृष्टय़ा दुर्बल व्यक्ती, विशेषकरून हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाने त्रस्त लोक
थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशात पोहोचणारे लोक
करू नका या चुका!
लोकांनी कदापिही उभ्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटं सोडून जाऊ नये. वाहनाच्या आतील तापमान वाढल्यास संबंधितांचा मृत्यू ओढवू शकतो. कुणाची शुद्ध हरपल्यास किंवा चक्कर येऊ लागल्यास, उलटी किंवा डोकेदुखी होत असल्यास, प्रचंड तहान लागल्यास किंवा श्वास जड होऊ लागल्यास किंवा हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढल्यास सतर्क व्हावे. ही सर्व लक्षणे उष्माघाताची असू शकतात असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.