अध्याय एकोणीसावा
भगवंत म्हणाले, मन माझ्या स्वरूपात ज्याला अर्पण करायचं आहे त्यासाठी एक सोपी युक्ती म्हणजे त्यानं माझं नामस्मरण करावं. माझे नामस्मरण केले असता त्याच्या पातकांचा नाश होतो. मनात काही इच्छा धरून नामस्मरण केले असता सर्व कामना पूर्ण होतात आणि निरिच्छपणाने नामस्मरण केले असता सर्व पातकांचे भस्म होते. पाप भस्म होण्याचा परिणाम म्हणजे रज आणि तम यांना जिंकून आपोआप धर्मपरायण व धार्मिक असा सत्त्वगुण वाढिला लागतो. वाढलेल्या सत्वगुणाच्यामुळे वैराग्याचे कायमचे ठाणे बसते. वैराग्याच्या योगाने विषय निर्दालन होते आणि आत्मज्ञान प्रगट होते. त्यामुळे शांतीचे समाधान वाढत जाते व मन मदर्पण होते. परिणामी निजभक्ति प्रगट होते. निजभक्ति पूर्णपणे प्राप्त झाली की, भक्ताने न मागताच अष्टमहासिद्धी आपण होऊन त्याच्या अंगणात येऊन उभ्या राहतात. पण माझ्या भक्ताना त्या महासिद्धीचे बिलकुल कौतुक नसते कारण त्याना केवळ माझ्याशी ऐक्मय साधायचे असते. माझ्या भक्तांचे माझ्याशी ऐक्मय झाल्यामुळे त्यांना माझी सारी सत्ता प्राप्त होते. अशी माझी भक्ती न जोडता व आत्मस्थिती न लाभता विषयासक्तीने वागू लागल्यास मोठा अनर्थ कोसळतो. विषयासक्त माणसाची विचारसरणी वेगळीच असते. तो वेदशास्त्रार्थ खरा मानीत नाही, परमार्थाला सत्य समजत नाही, त्याचा जीव घर, दार, बायकामुले व संपत्ती यांच्यातच गुंतून पडलेला असतो. विषयांशिवाय त्याला काही सुचतच नसते. विषयाच्या सतत संगतीत राहिल्याने त्याच्यातील रजोगुण अतिशय क्षुब्ध होऊन त्याचे चित्त ज्ञानाविषयी आंधळे होऊन राहते. ज्ञानाचा खरा अर्थ त्याला कधीच उमगत नाही. त्यामुळे त्याला सगळं विपरितच दिसू लागतं. असे लोक ज्याला विषयोपभोगातील नानाविध उपाय सुचतात, त्याला मोठा ‘ज्ञानी’ असे म्हणतात! आणि जो छलवादाच्या युक्तीने तोंड बंद करतो, त्याला ‘पंडित’ म्हणतात. ज्याचे मागे प्रपंचाचे मोठे लटांबर असते, त्याला ‘भाग्यवान्’ समजतात आणि जो नानाप्रकारच्या उपभोगांनी आपल्या शरीराचे पोषण करतो, त्याला मोठा ‘पुण्यवान्’ पुरुष म्हणतात. परमार्थविषयात जो अनुतापी असतो, त्याला महादुःखी म्हणतात, जो अनेक प्रकारच्या विषयांना पोसतो तो मोठा ‘सुखी’ समजतात. ज्याच्या शापाने मनुष्य मरतो, त्याचे ‘सिद्धत्व’ खरे मानतात आणि अनाचाराने जो स्वच्छंद वागणूक ठेवतो त्यास ‘मुक्त’ असे म्हणतात. ज्याचा आचार दांभिक असतो, तो पुरुष मोठा ‘पवित्र’ समजतात. जो अनुतापी व वैराग्यशील असतो त्याला ‘कपाळकरंटा’ असे म्हणतात! आणि जो राजरोस विषयांचा उपभोग घेतो, त्याला ‘राजयोगी’ असे मानतात! जो स्वतः द्रव्याचा अभिलाषी असतो, तो द्रव्य खर्च करणाऱयाला ‘मूर्ख’ लेखतो आणि खर्च न करणाऱयाला मोठा विचारी व जगामधील एक मोठा ‘धर्मज्ञ’ असे म्हणतात. ज्याच्या गाठीला पुष्कळसे द्रव्य असते, तो सर्वांना मोठा ‘पूज्य’, पवित्र आणि ‘ज्ञानी’ वाटतो. असे विपरीत ज्ञान त्यांना होऊ लागते. त्याच्याही पुढे जाऊन, आपण सर्वात्मा आणि सर्वेश आहोत, हे पूर्णपणे विसरून जाऊन आपण अधर्मी, अकर्मी, दीनदुबळा व अज्ञानी असे तो मानू लागतो. अशा ठिकाणी माझी भक्ती कशी उत्पन्न होणार आणि माझी प्राप्ती तरी कशाने होणार! अशा प्रकारे संसाराच्या भोवऱयात सापडून किती लोक गिरक्मया खात आहेत ह्याची गणतीच नाही. परमात्म्याच्या प्राप्तीला कारण अशी चार लक्षणे आहेत आणि ती अत्यंत गुह्य आहेत. ती तुझ्याबद्दलच्या अंतःकरणातील वात्सल्यामुळे मी तुला सांगतो. धर्माची मुख्य भूमिका म्हणजे भजन, त्यामुळे उत्पन्न होणारे ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे चार उपाय माझ्या प्राप्तीला आवश्य आहेत. ते चारी आता सांगतो ऐक. उद्धवा ! ज्याच्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते, तोच धर्म होय ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो, तेच ज्ञान होय. विषयांपासून अलिप्त राहणे हे वैराग्य होय आणि सिद्धी हेच ऐश्वर्य होय.
क्रमशः