नंदगड / वार्ताहर :
नंदगड-नागरगाळी रस्त्यावरील नागरगाळी गावाजवळील आंबेहोळ ब्रिज पाण्याखाली गेल्याने शनिवारी सायंकाळी पुलावरील पाण्यावरून धोकादायक प्रवास करण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली. या भागात शनिवारी दुपारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मुळातच नादुरुस्त असलेल्या आंबेहोळ ब्रिजवर तब्बल तीन ते चार फूट पाणी आले. हा पूल नादुरुस्त असल्याने पूलावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. उर्वरित जागेतून दुचाकी व चार चाकीचा प्रवास सुरू होता. शनिवारी पाऊस होऊन पुलावर पाणी आल्याने या पुलावर कोणत्या ठिकाणी खड्डे आहेत आणि कोठून रस्ता आहे. याची चिंता वाहनधारकांना लागून राहिली. तरीही जीवाच्या धोका पत्करून एकेक वाहने धक्का देऊन पुढे नेण्याची परिस्थिती येथे जमलेल्या लोकांवर आली. सायंकाळ उशिरापर्यंत हा संघर्ष सुरूच होता.
नंदगड- नागरगाळी या 30 किलोमीटरच्या रस्त्यावरील हा महत्त्वाचा पूल आहे. या रस्त्यावरून पुढे दांडेलीला जाण्यासाठी बर्ची मार्गे जवळचा रस्ता आहे. हलसी, नंदगड, मेरडा भागातील अनेक लोक दवाखान्यासाठी दांडेलीला जातात. जंगल सफारीसाठी व बोटींग करण्यासाठी अनेकजण बेळगाव व अन्य भागातून या रस्त्याने जातात. कुंभार्डा गावाजवळ नाथपंथीय हंडीभडगनाथ मठ आहे. येथे जाणार्यांची ही संख्या अधिक आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. या रस्त्यावरील आंबेहोळ पूल नादुरुस्त होऊन वर्ष झाले आहे. सदर ठिकाणी उंचीचे आरसीसी पूल बांधण्याची गरज व्यक्त होत आहे.