राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणण्याचे जोरदार प्रयत्न : हिंसेतील बळींच्या कुटुंबीयांना भरपाई जाहीर
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेथील दौरा करत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शाह यांनी मंगळवारी राज्याची राजधानी इम्फाळमध्ये महिलांच्या एका शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मणिपूरमध्ये सध्या विविध समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. तर ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू समवेत मणिपूरमधील 11 क्रीडापटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून राज्यातील संकट दूर करण्याची विनंती केली आहे. राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित न झाल्यास आम्ही आमचे पुरस्कार अन् पदकं परत करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्याच्या राज्यपाल अनुसुइया उइके यांची भेट घेतली. त्यानंतर स्थितीचे आकलन करणे तसेच स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री एन. विरेन सिंह आणि राज्याचे मंत्री, वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला आणि आयबी प्रमुख तपन डेका यांच्या उपस्थितीत राज्यासोबत केंद्राच्या अन्य अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली आहे. अमित शाह हे गुरुवारपर्यंत मणिपूरच्या दौऱ्यावर राहणार असून या कालावधीत अनेक टप्प्यांमध्ये बैठका घेणार आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने मणिपूरमधील संघर्षात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दंगलीतील बळींच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार आहे. राज्यातील जनतेसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याद्वारे अफवा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल.
विविध वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी पेट्रोल, एलपीजी गॅस, तांदूळ आणि अन्य अन्नधान्यांचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा निर्णय शाह यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत घेण्यात आला आहे.
संचारबंदी शिथिल
इम्फाळमध्ये संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यावर लोकांना अत्यावश्यक सामग्रीची खरेदी करण्यासाठी घरांमधून बाहेर पडता आले आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांतर्गत इम्फाळमध्ये एका सर्वपक्षीय बैठकीचे नेतृत्व अमित शाह करू शकतात. तर राज्य सरकारने हिंसेवरून बनावट वृत्त प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे.
काँग्रेस शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला
मणिपूरमधील हिंसेच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वात पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. मणिपूरमधील हिंसेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे केली आहे. 22 वर्षांपूर्वी देखील मणिपूर पेटत होते आणि तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, आज पुन्हा मणिपूर पेटत असून आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. यामागील कारण भाजपचे ध्रूवीकरणाचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
हिंसेत आतापर्यंत 80 बळी
राज्यातील हिंसेत आतापर्यंत 80 जणांना जीव गमवावा लागला आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हिंसा रोखण्यासाठी राज्यात सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. सैन्याने स्थितीवर नियंत्रण मिळविले असले तरीही काही भागात पुन्हा हिंसक घटना घडल्याने चिंता कायम आहे. मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात कुकी समुदायाकडून निदर्शने करण्यात आली होती. याचनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली आहे. 31 मेपर्यंत राज्यात इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे.