प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी आगामी येणाऱ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यासाठी बुथ पातळीपर्यंत बांधणी केली आहे. या मतदार संघातून भाजपाचा उमेदवार लढणार आणि खासदारही होणार असल्याचे भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणात लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा होणार असून रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत सभा होण्यासाठी आग्रही असल्याचे जठार यांनी सांगितले.
येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी जठार यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, उमेश कुळकर्णी आदीं उपस्थित होते. भाजपाचा लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा सुरु आहे. देशातील भाजपा पदाधिकारी, खासदार, मंत्री मतदार संघात जाऊन केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्यात का हे पहात आहे. प्रथम मंत्री वाडी-वस्तीवर जाऊन योजना अंमलबाजवणीची खातरजमा करत असल्याचे यावेळी जठार यांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर आहे. त्यांनी या मतदार संघाच्या दौऱ्याला चिपळूण येथून सुरुवात केली. चिपळूण ते राजापूर दौरा करताना त्यांनी प्रथम चिपळूण येथे मेळावा घेतला. त्यानंतर श्री क्षेत्र पर्शुराम देवस्थानाला भेट दिली. तेथील परिसर सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान वालावलकर ट्रस्टच्या रुग्णालयालाही भेट दिली. त्यांनी संर्पदंशावरील लस तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत केंद्रस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन मिश्रा यांनी दिल्याचे जठार यांनी सांगितले.
या दौऱ्यात डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी कृषी क्षेत्रातील माहितीही जाणून घेतली. देवरुख पंचायत समितीत आढावा बैठक घेत जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला 150 कोटी रु.या योजनेतून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. आता जलजीवन मिशनमधून प्रत्येक घरा-घरात पाणी पोहचणार असल्याचे जठार यांनी सांगितले.