पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार ः देशभरातील कार्यक्रमांचे ‘मन की बात’मधून कौतुक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या देशभरातील कार्यक्रमाचे कौतुक केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात संपूर्ण देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृतधारा बरसत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. सदैव आठवणीत राहणारे हे दृश्य केवळ दिखाऊ नव्हते तर लहान मुलांनी आणि युवा मित्रमंडळींनी पाठविलेल्या अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृतींमधून सदैव आठवणीत राहील, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांची पाठ थोपटली. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वच्छता मोहीम आणि लसीकरण मोहीम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
2023 हे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष
संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आता चार महिन्यातच नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे. ‘मन की बात’ च्या पुढच्या भागात तुम्ही बाजरीवर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले होते. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा दिला असून देशवासियांसाठी ही भूषणावह बाब असल्याचे सांगितले.
तृणधान्य उत्पादनाला प्राधान्य देण्याचा सल्ला
भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे. तृणधान्याचा हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्याविषयी जागरुकता वाढवायची आहे. मित्रांनो, तृणधान्ये शेतकऱयांसाठी ही फायदेशीर आहेत. ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही. आपल्या लहान शेतकऱयांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत. तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो, असे सांगत तृणधान्य उत्पादनाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला.