स्वच्छता करण्याकडे कंत्राटदार-महापालिकेचे साफ दुर्लक्ष
बेळगाव ; शहरातील कचऱ्याची उचल आणि गटारीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून 25 कोटीहून अधिक निधीचा खर्च केला जातो. मात्र स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदाशिवनगर सेकंड मेन क्रॉस परिसरातील गटारी कचऱ्याने तुंबल्या असून, स्वच्छता करण्याकडे कंत्राटदार आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी रहिवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. कचरा उचल शुल्क तसेच स्वच्छता कराच्या नावाखाली नागरिकांकडून मोठी रक्कम वसूल केली जात आहे. नागरिक ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मालमत्ता कराच्या माध्यमातून सर्व करवसूल करण्याचा सपाटा महापालिकेने चालविला आहे. इतका कर भरूनदेखील शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. कचऱ्याची उचल आणि वाहतुकीसाठी 25 कोटी आणि कचऱ्याचे विघटन करण्यासाठी 5 कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. तरीदेखील शहरातील कचऱ्याची उचल वेळेवर होत नाही. विशेषत: उपनगर भागात कचऱ्याची उचल आणि गटारींची स्वच्छता व्यवस्थित होत नाही. निविदेतील अटीप्रमाणे गटारी स्वच्छ करण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची आहे. पण कंत्राटदारांकडून गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सदाशिवनगर परिसरातील दुसरा क्रॉस येथील गटारी कचऱ्याने भरल्या असून, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी जमिनीमध्ये पाझरून विहिरी, कूपनलिकांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मनपाकडे याबाबत सातत्याने तक्रार करूनही गटार स्वच्छतेचे काम हाती घेतले नाही. मनपा अधिकाऱ्यांनी सदाशिवनगर परिसरात फेरफटका मारून समस्यांची पाहणी करावी व गटारींची स्वच्छता तसेच कचऱ्याची उचल करण्याची मागणी होत आहे.