केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : रोजगार मेळाव्यात 25 जणांना नियुक्तीपत्रे प्रदान
प्रतिनिधी /पणजी
देशात रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देणारा कार्यक्रम म्हणून रोजगार मेळ्याकडे पाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाद्वारे नाविन्यपूर्ण आणि नागरिक केंद्रीत तंत्रज्ञानातून रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
शुक्रवारी पणजीत आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्याहस्ते गोवा शिपयार्ड, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोकण रेल्वे, माझगाव डॉक शिपयार्ड अशा विविध खाती आणि विभागांमध्ये निवड झालेल्या एकूण 25 जणांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
शहरातील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सीमाशुल्क खात्याचे मुख्य आयुक्त एस टाटा, गोवा विभागाचे आयुक्त व्ही. सुंदरराजन यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. नाईक यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, उत्पादन आधारित लाभ आणि कौशल्य विकास या उपक्रमांचे रोजगार निर्मितीत योगदान देण्यावर भर दिला असल्याचे सांगितले. रोजगार मेळा भविष्यकालीन रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तऊणांना सक्षम आणि राष्ट्र विकासात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करेल, असे ते पुढे म्हणाले. रोजगार मेळ्यामुळे खासगी, सार्वजनिक क्षेत्रात रोजगार निर्मितीचे वातावरण निर्माण होण्यासही मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री. टाटा यांनी बोलताना, सरकारची सक्रिय भूमिका लाखो युवक आणि युवतींना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात मदत करत असल्याचे सांगितले. रोजगार मेळा ही देशातील रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी एक अभिनव संकल्पना असल्याचे सांगताना त्यांनी विविध सरकारी उपाययोजनांवर प्रकाश टाकला.