ऑनलाईन टीम/तरुण भारत
अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri East Bypoll) भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke)यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर मुरजी पटेल (Muraji Patel) यांच्या काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत निवडणूक कार्यालयाजवळ गोंधळ घातला. तसेच मुरजी पटेलांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. यावेळी रमेश लटके यांनी त्यांचा १६ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. मात्र काही महिन्यांपूर्वी रमेश लटके यांचे निधन झाल्याने अंधेरीत पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेले आणि उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी देण्यात आली, यामुळे ही पोटनिवडणुक चुरशीचे होणार असल्याचे चित्र होते. मात्र भाजप नेतृत्त्वाने मुरजी पटेल माघार घेणार असल्याची घोषणा केली. ज्यामुळे पटले यांच्या कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला आहे. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली आहे. भावना अनावर झालेल्या कार्यकर्त्यांनी काही अपशब्दांचाही वापर केला.
हे ही वाचा : MCA साठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध?, नाना पटोलेंनी व्यक्त केला संशय
याबाबत विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “मी समस्त भाजपाच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली ऊर्जा राखून ठेवावी. दोन महिन्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या ऊर्जेचा आपण उपयोग नक्की करू. पक्षाचा निर्णय कळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं, हे स्वाभाविक आहे. लोकशाहीत भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र आहे.”