मागील सहा दिवसांपासून पाण्याची गळती काढण्याकडे दुर्लक्ष, कंपनीने लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पाणी समस्या आणि जलवाहिन्यांची गळती हे एक समीकरणच बनले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाणीपुरवठा महामंडळ डागडुजी करते. मात्र ती कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी अपयशी ठरत आहे. खऱयाअर्थाने जर पाण्याची गळती थांबण्यास प्रयत्न करून ही समस्या निवारल्यास लाखो लिटर पाणी वाचेल, यात शंका नाही. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्षच करण्यात येते.
शहरातील अनेक ठिकाणी पाणीगळती ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र यावर ठोस उपाय करण्यात येत नसल्यामुळे डोके वर काढत आहे. काकतीवेस येथील सौंदर्या पेंट्स या दुकानासमोर मागील सहा दिवसांपासून मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील सहा दिवसांपासून या गळतीची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मध्यंतरी पाण्याच्या संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलून जनजागृती करण्याचा मानस मनपाने केला होता. मात्र आता हा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे गेल्यापासून तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी काम आणि बारा महिने थांब, अशी अवस्था होती. आता मात्र याचेही खासगीकरण करण्यात आल्याने याला कोणी वालीच नसल्याचे दिसून येत आहे.
अनेक ठिकाणच्या जलवाहिन्यांच्या गळत्यांवर योग्य ती उपाययोजना न केल्याने शहरात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याची काळजी पाणीपुरवठा महामंडळाने घेणे आवश्यक आहे. काकतीवेस येथे जेव्हा पाणी सोडण्यात येते तेव्हा शेकडो लिटर पाणी वाया जाते. येथील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र याकडे पाणीपुरवठा महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. एकीकडे पाणी समस्या गंभीर बनली असताना शहर परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जावू लागले आहे. यामुळे पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्मार्ट सिटीचा गाजावाजा आणि खासगीकरणामुळे गपचुप बसा, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. स्मार्ट सिटीतून अनेक वाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या तरी काही ठिकाणच्या समस्या कायमच्या बनल्या आहेत. यामुळे एक गळती काढून संपली की दुसरी निर्माण होते. वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच असे प्रसंग उद्भवतात. गळती लागताच काढल्यास नागरिकांचा रोष कमी होतो. पाणीपुरवठा मंडळाने मनमानी कारभार सोडून नागरिकांच्या हिताचा विचार करण्याची गरज आहे.
अनगोळ येथील घराची भिंत कोसळून नुकसान
रघुनाथ पेठ, अनगोळ येथील एका घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. संतोष महादेव असलकर यांचे हे घर आहे. शाळेला सुटी असल्यामुळे घरातील इतर सर्वजण गावाला गेले होते. संतोष आणि त्यांचा मुलगा एवढेच घरी होते. ते हॉलमध्ये रात्री झोपणार होते. मात्र त्यांना माती पडण्याचा आवाज आला. त्यानंतर ते तेथून बाजूला झाले. काही वेळातच ती भिंत कोसळली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे ही भिंत कोसळली असून यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा तातडीने घराचा सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.