प्रतिनिधी /बेळगाव
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. जिल्ह्यातील 12 लाख 28 हजार 580 गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी 5 हजार 927 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान, अधिवेशनासाठी बेळगावात आलेले पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहान जिल्ह्यातील लम्पीग्रस्त भागांना भेट देऊन आढावा घेत आहेत. बेळगाव, सौंदत्ती, हुक्केरी, चिकोडी आदी तालुक्यात लम्पीग्रस्त भागांना भेट दिली.
सप्टेंबर दरम्यान शिरकाव झालेल्या लम्पीने जिल्ह्यात सर्वत्र हातपाय पसरले आहेत. अद्यापि 46 हजार 169 जनावरांना लागण झाली आहे. तर समाधानकारक बाब म्हणजे 28 हजार 354 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. विशेषत: गोवंशीय जनावरांना या रोगाची लागण होत आहे. त्यामुळे दुधावर देखील परिणाम झाला आहे. जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्याचबरोबर लागण झालेल्या जनावरांसाठी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, शासनाकडून लम्पीने दगावलेल्या जनावर मालकांना भरपाई दिली जात आहे. जिल्ह्यातील 5 हजार 4 शेतकऱ्यांना तब्बल 9 कोटी 13 लाख 85 हजाराचा निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये पारदर्शकता रहावी, यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाई जमा करण्यात आली आहे. लम्पीने दगावलेल्या बैलासाठी 30 हजार, गायीसाठी 20 हजार आणि वासरासाठी 5 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.
पशुसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांनी मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यातील खनगाव आणि इतर लम्पीग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शिवाय नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जात असल्याचे सांगितले होते. जिल्ह्यात 9 लाख गोवंशीय जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 5 हजार 927 जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शिवाय जिल्ह्यातील दूध उत्पादनावरदेखील परिणाम झाला आहे. शिवाय जनावरांचे बाजारदेखील बंद असल्याने नवीन जनावरे खरेदी थांबली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
भरपाईचा दुसरा टप्पा
लम्पीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात काही नुकसानग्रस्तांना भरपाई दिली होती. आता दुसऱ्या टप्प्यात भरपाई दिली जात आहे. सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार आहे.
-डॉ. आनंद पाटील (तालुका पशुसंगोपन अधिकारी)