- नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव
- थंडी गायब
प्रतिनिधी,कोल्हापूर
ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी कडाक्याचा थंडीचा. पण गेल्या काही वर्षातील वातावरणातील बदल पाहिल्यास पावसाचे प्रमाण वाढले आहे आणि थंडीत घट झाली आहे. यंदाही नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी थंडीचा पत्ता नाही. तर ऐन हिवाळ्य़ात अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
भारतीय हवामानाप्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि हे उन्हाळा हे मुख्य तीन ऋतू आहेत. पण जगभरातील जागतिक तापमानवाढीचा देशातील वातावरणावर परिणाम होऊन ऋतुमान बदलत आहे. गेल्या काही वर्षापासून घडत असलेल्या घटनांवरुन याची प्रचिती येते. यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस पडायचा. आता मात्र कधीही, कोठेही ढगफुटीप्रमाणे पाऊस पडत आहे. अवेळी पडणाऱ्या अशा पावसाचा शेतीसह अन्य घटकांवर परिणाम होत आहे.
24 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस राहिला. 25 ऑक्टोबर पासून पाऊस थांबून थंडीला सुरुवात झाली. पण ही थंडी ऑक्टोबर अखेरपर्यंतच राहिली. त्यातही दोन ते तीन दिवस पारा 16 ते 17 अंश सेल्सियपर्यंत खाली आला होता. हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. पण हवामान विभागाचा अंदाज सद्या तरी फेल गेल्याचे चित्र दिसत आहे.
सद्या नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुरु आहे. त्यामुळे या महिन्यात थंडीचे प्रमाण वाढणे अपेक्षित आहे. या दिवसात अंगात हुडहुडी भरायला लावणारी थंडी असायला हवी. पण उलटा अनुभव येत आहे. ऑक्टोबर हीट प्रमाणे उष्णता जाणवत आहे. सकाळपासून उन्हाचे चटके बसत असून, अंगातून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे ऐन थंडीत पंखे, एसीचा वापर वाढला आहे. बदललेल्या या विचित्र वातावरणामुळे नागरिकही बुचकाळयात पडले आहेत. नेमका कोणता ऋतु सुरु आहे असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.
आठवडभरात थंडीची शक्यता
नोव्हेंबर थंडीचा महिना असूनही कोल्हापूरचे कमाल तापमान 31.1 अंश सेल्सियस तर किमान तापमान 20.5 अंश सेल्सियस होते. रविवारी दिवसभर आकाश निरभ्र व तापमानात वाढ आढळली. हे हवामान बदलाचे संकेत आहेत. नोव्हेंबर थंडीचा महिना असूनही तापमानात होणारी वाढ चिंतेचा विषय आहे व त्याचा परिणाम शेतीवर ही दिसेल. वर्षभर प्रत्येक महिन्यात पाऊस, अचानक थंडी गायब होणे, उष्णतेमध्ये वाढ हे हवामान बदलाचे परिणाम आहेत.पण हिवाळा सुरु झाला असल्याने आठवभरात थंडीला सुरुवात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
डॉ. युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक