मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : राज्यातील अनेक दुर्गम भाग आणि शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर चालणाऱ्या कदंबच्या बससेवेस बळकटी आणि चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने खासगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यास मान्यता दिली आहे. ’म्हजी बस’ योजनेंतर्गत या बसेस घेण्यात येणार असून कदंब महामंडळाच्या नियंत्रणाखाली त्या चालविण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. त्यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचीही उपस्थिती होती. कंत्राटी पद्धतीने या खासगी बसेस घेण्यात येणार असून फोंडा-पणजी, काणकोण-पणजी, पेडणे-पणजी, सावर्डे-पणजी या मार्गांवर प्रायोगित तत्वावर या बसेस चालविण्यात येणार आहेत. त्यानुसार या मार्गांवर सध्या चालणाऱ्या खाजगी बसेस या योजनेच्या कक्षेत येतील. बसने कापलेल्या अंतरानुसार मालकांना निश्चित रक्कम देण्यात येईल. या बसचा चालक खाजगी असेल तर वाहक कदंबचा कर्मचारी असेल. देखभाल आणि अन्य खर्च मालकांना करावा लागेल.
पूर्ण खातरजमा करूनच बसेसची निवड
ही योजना प्रथम चार मार्गांवर राबविण्यात येणार असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार उर्वरित मार्गांचा विचार करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बसेसची निवड करण्यापूर्वी त्यांच्या सुस्थितीची सखोल खातरजमा करण्यात येईल. त्यांचे वेळापत्रक प्रवाशांना डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचीही सरकारची योजना आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात रात्री 8 नंतर बससेवा उपलब्ध नाही. त्यावर तोडगा काढणार असून प्रसंगी तोटा सहन करण्याचीही तयारी असल्याचे नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या बसेसचा लाभ स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात होणार असून त्याशिवाय विविध औद्योगिक वसाहतीनी तिसऱ्या शिफ्टची ड्युटी जॉईन करणाऱ्यांसाठीही ती लाभदायक ठरणार आहे. गोव्यात प्रमुख चार औद्योगिक वसाहती असून तेथे हजारो कामगार तिन्ही पाळ्यांमध्ये काम करतात. ही सेवा उपलब्ध करण्यासाठी आम्हाला कदंब तसेच खासगी बसमालकांचे सहकार्य हवे आहे. दोघेही मिळून लोकांना सर्वोत्तम सेवा देऊ शकतो. या सेवेदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही विचार केला जाईल, असे सावंत म्हणाले. सध्या राज्यात सुमारे 1,460 खाजगी तर कदंबच्या सुमारे 600 इलेक्ट्रिकल आणि अन्य बसेस आहेत.