प्रदूषण रोखण्याऐवजी तलावाच्या सुशोभिकरणावर कोट्यावधी खर्च; मनपाचा पर्यावरण विभाग नावालाच
कोल्हापूर प्रतिनिधी
ऐतिहासिक रंकाळा तलावाची (Rankala Lake, Kolhapur) परिस्थिती गंभीर झाली आहे. महापालिका प्रशासन सांडपाणी रोखल्याचा दावा करत असली तरी तलावातील पाणी हिरवट झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून तर मृत मासे तरंगताना दिसून येत आहेत. एकूणच रंकाळ्यातील जलचर धोक्यात आहे. महापालिका प्रशासन मात्र, याकडे गांभिर्याने पाहत नाही.
कोल्हापुरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला ऐतिहासिक तलावाच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. कठडे कोसळत असून संध्यामठची स्थिती दयनीय झाली आहे. मनपा प्रशासनाकडून डागडुजी केली जात असली तर या कामास गती नाही. दुसरीकडे तलावातील प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तलावाच्या चारही बाजूने काटाला हिरवा तवंग आलेला आहे. मनपा तलावात सांडपाणी रोखत असल्याचा दावा करत आहे. मग तलावातील पाणी हिरवट का झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे अद्यपही तलावात परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्येच भरीत भर म्हणजे चार दिवसांपासून तलावात मृत माशांचा खच पडलेला दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने चार ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले आहे. त्यामध्ये ऑक्सिजनची लेव्हल योग्य असल्याचे म्हटले आहे. मग नेमके मासे कशा मुळे मृत झाले हा प्रश्न मनपा प्रशासनासमोर आहे.
पर्यावरण अभियंतांचा फोन स्वीच ऑफ
रंकाळा तलावासह शहरातील तलावांची जबाबदारी असणारा पर्यावरण विभागाचे काम रामभरोसे सुरू आहे. यामुळे वृक्ष प्राधिकरणाच्या समितीच्या बैठकीत वारंवार पर्यावरण अभियंता समीर व्यांघ्रभरे सदस्यांच्या धारेवर असतात. रविवारी दिवसभर त्यांचा फोन स्विच ऑफ होता.
मासे मृत होण्याची शक्यता
-उष्मा वाढल्याने गाळ साचलेल्या ठिकाणी ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने
-चार दिवसांपूर्वी रात्री आलेल्या पावसाने सांडपाणी मिसळल्याची शक्यता
-मासेमारी करणाऱ्याकडून मृत मासे तलावातच टाकले असल्याने
महापालिकेने रंकाळा तलावातील चार ठिकाणच्या पाण्याची नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ऑक्सिजन (डिओ) लेव्हल किमान 3.5 आवश्यक असताना 4.8 असल्याचे दिसून आले आहे. नेमके मासे मृत का होतात. याची तपासणी पर्यावरण विभागाकडून सुरू आहे.
नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता, महापालिका