पुणे / प्रतिनिधी :
जागतिक परिस्थिती सध्या बदलत आहे. देशाच्या उत्तर सीमेवर पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या असून, हिंदी महासागरात त्यांचा वावर वाढलेला आहे. यासोबतच शेजारील राष्ट्रांची बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता लष्कर दोन्ही आघाडय़ांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचा निर्धार सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी व्यक्त केला.
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 144 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मंगळवारी क्षेत्रपाल मैदानावर उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्ट. जन. अजयकुमार सिंग, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल अजय कोचर आदी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रपती सुवर्णपदक आफ्रिद अफरोज, रौप्यपदक अंशु कुमार आणि ब्राँझ पदक प्रवीण सिंग यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
जनरल चौहान म्हणाले, भारताच्या आजूबाजूची भूराजकीय परिस्थिती सध्या बदलत आहे. दुसऱया बाजूला हिंद महासागरात पीएलएचे वर्चस्व वाढत आहे, तर भारताच्या शेजारी अनेक राजकीय उलथापालथ घडत आहेत. अशा दोन्ही परिस्थितीत भारतीय लष्कराला लढायचे आहे. भारतीय लष्करात आता तंत्रज्ञानाची उत्क्रांती पाहायला मिळत आहे. आगामी काळात तुम्ही एकत्र येऊन नवीन युद्ध प्रणालीचा सामना कराल आणि देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाल, याचा मला विश्वास आहे.