न्यू वंटमुरी येथील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिचा खून करण्यात आल्याची घटना न्यू वंटमुरी येथे घडली होती. ही गंभीर घटना घडूनही सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्या संशयित आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
न्यू वंटमुरी येथील गौरव्वा कोन्नुरी या महिलेचा खून करण्यात आला होता. पती मंजु यल्लाप्पा कोन्नुरी, सासरा यल्लाप्पा सिद्धाप्पा कोन्नुरी, सासू रेणुका यल्लाप्पा कोन्नुरी यांनी हा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्वांवर काकती पोलीस स्थानकामध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. या घटनेला आठ दिवस उलटले आहेत. तरीदेखील या आरोपींना अटक करण्यात आली नाही. तेंव्हा तातडीने सर्वांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गौरव्वा ही गर्भवती होती. त्यामुळे दोन खून झाल्याचा आरोपदेखील करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले होते. त्यांनीच हे निवेदन स्वीकारले.
यावेळी अॅड. एन. आर. लातूर, बसवराज गोदग्याप्पगोळ, फकिराप्पा वराग, प्रकाश मादिगेर, सुरेखा आळवी, रवी जगमयण्णावर, श्रीशैलगौडा पाटील, राजू यरगणवी, ईश्वरगौडा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.