सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. राहूल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांचा मी निषेध करतो. राहूल गांधी देशाची निंदा करत असून त्यांची ही कृती देशद्रोहाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही म्हणणारे उद्धव ठाकरे नमके काय करणार आहेत असा प्रश्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासह त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेउन आपली भुमिका स्पष्ट केली.
आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहूल गांधी यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “सावरकरांचे अनेक क्षेत्रात योगदान आहे. फक्त महाराष्ट्रच नाही संपुर्ण देश त्यांचा गौरव करत आहे. स्वत:ला हिंदुवादी म्हणणारे गप्प का त्यांनी एक शब्द काढला नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी थोबडीत हाणली असती. हे धाडस ते करणार आहेत का ?” असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राहूल गांधीच्या वक्तव्यावर योग्य भुमिका घेण्याऐवजी ठाकरे गट राहूल गांधीच्या अपात्रतेच्य़ा विरोधात काळ्या फिती लावून आंदोलन करत आहेत हे दुर्दैव आहे. काल परवा जे सभागृहातदेखिल सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे म्हणणारे मुग गिळून गप्प का होते ? सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार ? हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे….तू मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो अशी त्यांची भुमिका आहे. त्यामुळे मी राहूल गांधीचा जाहीर धिक्कार करतो. आम्ही लवकरच संपुर्ण राज्यभरामध्ये सावरकरांची देशभक्ती तळागाळात पोहोचवण्यासाठी ‘सावरकरांची गौरव यात्रा’ सुरु करणार आहोत.” अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.