लाखोंचा फटका, चाऱ्याचा प्रश्न, शेतकरी चिंतेत
बेळगाव : अतिवाड येथे एकाचवेळी 11 गवतगंजींना आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अज्ञातांनी लावलेल्या आगीत सुका चारा जळून खाक झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर चारा समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त गवतगंजींचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. जनावरांसाठी एकाच ठिकाणी चाऱ्याचा साठा करून ठेवलेल्या गवतगंजींना अज्ञातांनी आग लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षीदेखील अज्ञातांनी लावलेल्या आगीत दहा गवतगंजी जळून खाक झाल्या होत्या. पुन्हा यावर्षी गवतगंजींना आग लावण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे संशय व्यक्त होऊ लागला आहे. परिसरात हॉटेल आणि धाबे आहेत. दरम्यान काही तरुण मद्यधुंद अवस्थेत हे प्रकार करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अतिवाड येथील नागेंद्र पाटील, सुरेश पाटील, रामू पाटील, यल्लाप्पा चिकले, नागोजी कृष्णा पाटील, अशोक जोतिबा बेळगावकर, धाकलू मिनाजी बेळगावकर, गोपाळ बाळू कामेवाडी, गजानन बाळू बोकमूरकर यासह इतर शेतकऱ्यांच्या गवतगंजी जळाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आधीच चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सुक्या आणि ओल्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच साठवून ठेवलेला चारा जळाल्याने शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. अतिवाडमध्ये सातत्याने गवतगंजींना आग लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या गवतगंजींचे नुकसान होत आहे. अलीकडे जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. जनावरांसाठी चाऱ्याची साठवणूक केली जाते. वर्षभर पुरेल इतका चारा एका ठिकाणी साठविला जातो. मात्र अशा साठविलेल्या गवतगंजींनाच अज्ञातांकडून आग लावली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो.