वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीपी टूरमधील उपस्थितीच्या दृष्टीने भारतीय टेनिसला मोठा धक्का बसला असून देशावर त्यांची एकमेव एटीपी 250 स्पर्धा गमावण्याचा प्रसंग आला आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा 1996 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि अलीकडेपर्यंत ती ‘टाटा ओपन महाराष्ट्र’ या नावाने आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनने 2018 मध्ये ही स्पर्धा देशाबाहेर जाण्यापासून रोखली होती. त्यावेळी तामिळनाडू टेनिस असोसिएशनने 13 वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेचे आयोजन करणे सोडले होते. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र सरकार, आयएमजी आणि राईज वर्ल्डवाइड (रिलायन्स समूहाचा उपक्रम) यांच्यातील एक व्यवस्था होती.
‘आयएमजी व राईज यांच्यासोबतचा करार यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनने 5 वर्षांसाठी या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्याची बांधिलकी स्वीकारली होती, असे सदर संघटनेचे सचिव सुंदर अय्यर आणि स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आम्हाला जेव्हा इतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्याची योग्य संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्रात आणि उर्वरित भारतात टेनिसला प्रोत्साहन देण्याची बांधिलकी महाराष्ट्र सरकार आणि आमचे प्रायोजक टाटा या दोघांनीही दाखविलेली आहे. आमच्या खेळाडूंच्या आणि भारतीय टेनिसच्या हिताच्या दृष्टीने यासंदर्भात आम्ही योग्य दिशेने पाठपुरावा करत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
भारतीय टेनिससाठी ही घटना म्हणजे नक्कीच एक धक्का असून एटीपी वर्ल्ड टूरमध्ये समावेश असण्याचे बरेच फायदे आहेत. हे फायदे केवळ खेळाच्या दृष्टीने नव्हे, तर स्पर्धेच्या आयोजन करणाऱ्या शहराच्या दृष्टीने देखील आहेत. या स्पर्धेत यापूर्वी राफेल नदाल, कार्लोस मोया, स्टॅनिस्लास वावरिंक आणि मारिन सिलिक यासारख्या दिग्गज खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. असे खेळाडू भाग घेतात तेव्हा खेळाची लोकप्रियता वाढते आणि त्या शहरालाही महत्त्व प्राप्त होते. मात्र अलीकडे आयोजकांना उपलब्ध झालेला सर्वोत्तम खेळाडू हा सिलिक तेवढा होता.
पण भारताच्या एकेरीतील खेळाडूंना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून पाहता याला धक्का म्हणता येणार नाही. भारतीय खेळाडूंचे क्रमवारीतील स्थान खूप खाली असल्याने या स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी त्यांना वाइल्ड कार्डवर अवलंबून राहावे लागायचे. या स्पर्धेने पाच आवृत्त्यांमधून 1250 एटीपी रँकिंग पॉइंट्स दिले आणि भारतीय खेळाडू केवळ 80 पॉईंट्स कमवू शकले. ते कधीही दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अशा मोठ्या स्पर्धेऐवजी चॅलेंजर्स स्पर्धा घेणे अधिक फायदेशीर असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.