वनविभागाकडून सावधानतेचा इशारा, मृत अवस्थेत सापडला कोल्हा
प्रतिनिधी/हातनूर
तासगाव तालुक्यातील तासगाव-विटा राज्यमार्गावरील शिरगाव येथील माळ भाग वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात प्राण्याने सहा जनावरांवर हल्ला केला आहे. यामध्ये दिनकर शमराव पाटील यांची दोन- बैले, दिनकर सदाशिव पाटील यांची, दोन म्हैशी , दोन लहान रेडकू व इतर दोन जनावरे जखमी झाली आहेत. तर, याशिवाय याठिकाणी मृत अवस्थेत एक कोल्हा सापडला आहे. त्यामूळे शेतकरी वर्गातून भीती व्यक्त केली जात आहे.
येथील वस्तीवरील दीपक प्रल्लाद पाटील यांची दोन मोठी पाळीव कुत्रे गायब झाली आहेत. याबाबतची माहिती मिळतात वनविभागाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे, अशी माहिती येथील विशाल पाटील यांनी दिली आहे.
शिरगाव येथील घटनास्थळी वनविभाग अधिकाऱ्यांनी धाव घेत येथील पाहणी केली. यावेळी, तरस किंवा तत्सम प्राण्यांने हल्ला केल्याचा अंदाज वन विभागाचे अधिकारी महाडिक कोळी यांनी वर्तवला आहे. तर, या परिसरातील नागरिकांनी रात्री एकटे बाहेर पडू नये व जनावरे बंदिस्त जागेमध्ये बांधावी अशा सुचना करत सावधानतेचा इशारा दिला आहे.तर, याच ठिकाणी मृत अवस्थेत सापडलेला कोल्हा वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
शिरगावच्या सरपंचांनी वन विभागाकडे अज्ञात जंगली प्राण्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपली जनावरे बंदिस्त गोठ्यात सुरक्षित बांधावित असे आवाहन केले आहे. तर जंगली प्राण्याच्या शोधासाठी टीम तयार करून ग्रस्त घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.