पुणे / प्रतिनिधी :
मुंबईसह कोकणातील 4 जिल्ह्यात आकाश काहीसे ढगाळलेले असले, तरी किमान तापमानही सरासरीपेक्षा 1 ते 2 डिग्रीने खालावलेलेच असेल. त्यामुळे पुढील 4 दिवस (दि. 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत) साधारण थंडीबरोबरच तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यापुढे मात्र आठवडाभर साधारण थंडी ही कोकणात जाणवेलच, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
याबाबत खुळे म्हणाले, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर अशा 6 जिल्ह्यात पुढील 3 दिवसांपर्यंत (दि. 30 ते 2) किमान तापमान सरासरीपेक्षा 2-4 डिग्रीने वाढलेले असल्यामुळे विशेष थंडी जाणवणार नाही. दि. 3 नंतर मात्र थंडीत हळूहळू वाढ होईल. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक या 4 जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ व मराठवाडय़ात 30 नोव्हेंबरपासून किमान तापमान हे सरासरीपेक्षा 2-4 डिग्रीने घसरून साधारण 8-10 डिग्रीदरम्यान राहून आठवडाभर साधारण थंडी ही जाणवेलच.
अधिक वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा भीषण अपघात; 100 फूट दरीत कोसळला ट्रक
कोकणात पुढील 4 दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून नवीन पश्चिम झंझावात काश्मीर भागात आदळेल. त्यामुळेच पहिल्या आठवडय़ात आपल्याकडे थंडीची शक्यता जाणवते.