पावसाचा पत्ता नाही, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे : मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आवाहन
बेळगाव ; जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. शिवाय म्हणावा तसा वळीव बरसला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. साहजिकच पेरणी लांबणीवर पडली आहे. परिणामी बळीराजाची चिंता वाढली आहे. धूळवाफ पेरणी केलेली भात पिकेदेखील अडचणीत आली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे धूळवाफ पेरणीलादेखील धोका निर्माण झाला आहे. यंदा वळीव पाऊस म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे मशागतीचे कामे रखडली आहेत. त्याबरोबर पेरणीदेखील लांबणीवर पडली आहे. बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागून राहिले आहेत. जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून सक्रिय होतो. मात्र यंदा 15 जूननंतर मान्सून सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. सध्या मान्सूनचे आगमन होण्याचे कोणतेही वातावरण दिसून येत नाही. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. शिवाय सायंकाळच्या वेळेत सोसाट्याचा वारा देखील सुटू लागला आहे. त्यामुळे लवकर पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत.
सर्वत्र पाण्याचेच संकट
खरीप हंगामात भात, ज्वारी, ऊस, भुईमूग, बटाटा, रताळी, सोयाबीन, उडीद, तूर, मूग, कापूस आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. मात्र यंदा सर्व पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान कृषी खात्याने मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र मान्सूनला सुरुवात झाल्यानंतरच पेरणीची कामे एकदाच सुरू होणार आहेत. परिणामी मजुराचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: मान्सून लांबणीवर पडल्याने पाण्याची समस्या गंभीर बनू लागला आहे. जलाशय, तलाव, नाले, नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची धांदल पहायला मिळायची. मात्र, यंदा पावसाअभावी पेरणी तर सोडाच मशागतीची कामेदेखील पाहायला मिळत नाहीत. काही ठिकाणी थोड्या फार प्रमाणात वळीव झाला आहे. काही ठिकाणी काहीच पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
पावसाअभावी बी-बियांणेही पडून
खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने सर्व तयारी केली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 7.11 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रयत संपर्क केंद्र, कृषी पतीन संघ आणि सेवाकेंद्रामध्ये बी-बियाणी, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र पावसाचाच पत्ता नसल्याने बी बियाणेदेखील केंद्रामध्ये तशीच पडून आहेत. मान्सूनला सुरुवात झाल्यानंतरच बी-बियाणे आणि खताच्या मागणीत वाढ होणार असल्याचे समजते.
बी-बियाणे उपलब्ध
जमिनीत पुरेसा ओलावा आणि नियमित मान्सून सुरू झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके रयत संपर्क केंद्र आणि कृषी पतीन संघामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत.
– राजशेखर विजापूर (कृषीखाते सहसंचालक)