गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय : सद्यकाळात नागांचा पसंतीचा आहार असल्याची टिप्पणी
► वृत्तसंस्था / कोहिमा
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कोहिमा खंडपीठाने नागालँडमध्ये डॉग मीटवर घालण्यात आलेली सर्व प्रकारची बंदी हटविली आहे. म्हणजेच आता नागालँडमध्ये श्वानांचा व्यापार, बाजारपेठांमध्ये डॉग मीटची खरेदी-विक्री आणि रेस्टॉरंटमध्येही डॉग मीट मिळणार आहे. व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला, तर श्वानप्रेमींनी चिंता दर्शविली आहे.
जुलै 2020 मध्ये नागालँडमध्ये डॉग मीटवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उच्च न्यायालयाने रद्द ठरलिवी आहे. न्यायाधीश मार्ली वानकुंग यांनी डॉग मीट सद्यकाळात देखील नागालँडच्या लोकांमध्ये आहार म्हणून वापरले जात असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
डॉग मीट नागांमध्ये स्वीकारार्ह खाद्य असल्याने याचिकाकर्त्यालाही (व्यापारी) स्वत:ची उपजीविका चालविण्याचा अधिकार असल्याची टिप्पणी खंडपीठाने केली आहे. श्वानाचे मांस हे स्टँडर्ड ह्युमन फूड नसल्याने 2011 मध्ये याला अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत माणसांसाठी सुरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. डॉग मीटवर घालण्यात आलेली बंदी आश्चर्यकारक नव्हती. कारण ईशान्येतील काही हिस्से वगळता देशातील अन्य ठिकाणी डॉग मीटच्या सेवनाचा विचारसुद्धा केला जात नाही.
डॉग मीटवर नोव्हेंबर 2020 मध्ये बंदी घालण्यात आली होती. तेव्हा कोहिमा नगर परिषदेच्या 3 परवानाधारक व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात या बंदीच्या विरोधात धाव घेतली होती. बंदीनंतर काही दिवस डॉग मीटची विक्री बंद राहिली होती, परंतु असोसिएशनशी चर्चेनंतर पुन्हा विक्री सुरू करण्यात आली होती. नागालँडमधील सर्व लोक डॉग मीटचे सेवन करत नाहीत. परंतु काही विशिष्ट समुदायाचे लोक विशेषकरून गरोदर महिला, कर्करोगाचे रुग्ण, शस्त्रक्रिया करवून घेतलेले लोक याचे सेवन करत असतात. नागालँडमधील काही समुदाय डॉग मीटमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानतात, परंतु याला कुठलाच शास्त्राrय आधार नाही.
नागालँडमध्ये डॉग मीट सेवनाची परंपरा जुनी आहे, परंतु 2016 मध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. तेव्हा डॉग मीटच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. नागालँडमध्ये डॉग मीटच्या विक्रीविरोधात अनेक प्राणीहक्क कार्यकर्ते सक्रीय झाले होते आणि हा विषय उच्च न्यायालय मग सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता.
भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले
मागील 7 वर्षांमध्ये देशात भटक्या श्वानांची संख्या सर्वाधिक नागालँडमध्ये वाढली आहे. 2012 मध्ये शासकीय आकडेवारीनुसार केवळ 7 भटके श्वान होते, 2019 पर्यंत भटक्या श्वानांची संख्या वाढून 342 पर्यंत पोहोचल्याची माहिती एका प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत देण्यात आली होती.