प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर सकाळची विमानफेरी सुरू करण्याची मागणी अखेर इंडिगोने पूर्ण केली आहे. रविवार दि. 30 पासून आता विमान प्रवाशांना सकाळचाही बेंगळूर-बेळगाव असा प्रवास करता येईल. या नव्या विमानफेरीमुळे प्रवाशी संख्येत वाढ होईल, असा अंदाज आहे.
सकाळच्या सत्रात बेंगळूरहून बेळगावला येण्यासाठी विमानफेरी नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. इंडिगोचे विमान सायंकाळी सेवा देत असल्यामुळे सकाळच्या सत्रात पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. बेळगाव येथे सुवर्णसौध असल्यामुळे अनेक सरकारी कार्यालयांच्या उपशाखा येथे आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, उद्योजक यांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूर-बेळगाव विमानफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.
कोरोनापूर्वी दररोज तीन विमाने बेंगळूर-बेळगाव या मार्गावर सेवा देत होती. परंतु आता मात्र केवळ इंडिगो ही एकच कंपनी सेवा देत होती. सकाळी 9.15 वाजता बेंगळूर येथून निघालेले विमान सकाळी 10.55 वाजता बेळगावला पोहोचेल. तर सकाळी 11.15 वाजता बेळगाव येथून निघालेले दुपारी 12.40 वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे. या नवीन सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.