ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे सुरू असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी गुरूवारी पूर्ण झाली. मात्र, न्यायालयाने यासंदर्भातील निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणात पुण्यात आता चक्क सरन्यायाधीशांना उद्देशून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लोकशाही वाचवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
काय लिहिलंय बॅनरवर?
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपण सर्व जाती धर्मातील लोक हे गर्वाने सांगतो. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा केलेला गैरवापर आदी गोष्टींमुळे आपल्या देशात खरंच लोकशाही उरली का? असा देशील प्रश्न पडतो. दिवसा ढवळय़ा लोकशाही गाडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेने उघड डोळय़ांनी पाहिले आहे. सत्ताधारी दडपशाहीने अधिकारांचा गैरवापर करुन हुकूमशाहीला पूरक असे वातावरण करत आहेत. अशा परिस्थितीत तमाम भारतातील जनता आपल्याकडे न्यायाची आस लावून बसली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अंत्यत महत्वाचा आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्याल, याची खात्री आहे. अन्यथा भारतातील हुकूमशाहीची ही सुरुवात असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीचा विजय असो, असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.
अधिक वाचा : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर ‘ईडी’चे छापे