निवडीसाठी यो-यो व डेक्सा चाचणीचा निकष सक्तीचा, वनडे वर्ल्ड कपसाठी 20 खेळाडूंची निवड
वृत्तसंस्था/ मुंबई
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत इंग्लंडकडून संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआय आता ऍक्शन मोडमध्ये आले असून यावर्षी होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप व वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवर नजर ठेवत खेळाडूंच्या फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. भारताताच होणाऱया वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांनी 20 खेळाडूंची यादी तयार केली असून यापुढे निवडीसाठी पुन्हा एकदा यो-यो फिटनेस चाचणी घेतली जाणार आहे. याशिवाय आता डेक्सा (हाडांची तपासणी) टेस्टही घेतली जाणार आहे. कसोटी व वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे नेतृत्व कायम असल्याचेही या बैठकीत स्पष्ट झाले.
रविवारी 1 जानेवारी रोजी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे चेअरमन व्हीव्हीएस लक्ष्मण, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, मावळते निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्याशी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेत आढावा व नवा आराखडा या संदर्भात बैठक घेतली. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सध्या ऑस्ट्रेलियात सुटीवर असून ते या बैठकीत व्हर्च्युअली सामील झाले होते.
या बैठकीला हजेरी लावलेल्या एका विश्वसनीय सूत्राने सांगितल्यानुसार, भारतात होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची यादी तयार करण्यात आली आहे. या खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेआधी रोटेट केले जाणार असल्याचा निर्णय आढावा बैठकीत मंडळाने घेतला आहे. ‘ही अतिशय रचनात्मक व फलदायी बैठक होती, ज्यात आम्ही संघाच्या मागील कामगिरीचा आढावा घेतला आणि वनडे विश्वचषक व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तसेच भविष्यातील अन्य कार्यक्रमांचे नियोजन केले. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणार आहोत, मात्र आयपीएलचे महत्त्वही कमी होऊ देणार नाही,’ असे त्यात ठरल्याचे या सूत्राने उघड केले.
या बैठकीच्या तयारीसाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांच्या अनेक बैठका झाल्या होत्या. ‘शनिवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय क्रिकेटचे ‘आरोग्य’ सुधारण्यासाठी यापुढे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे पहावयास मिळेल,’ असेही या सूत्राने सांगितले. खेळाडूंच्या उपलब्धतेचा प्रश्न, वर्कलोडचे नियोजन आणि फिटनेसचे निकष यावर तसेच वनडे वर्ल्ड कपच्या तयारीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले. वनडे व कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मावर बीसीसीआयने पूर्ण विश्वास दाखविला असून त्याच्या पदाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याने दोन्ही प्रकारात कर्णधार म्हणून समाधानकारक कामगिरी केली असल्याने या बैठकीत त्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले.
निवडीसाठी यो-यो व डेक्सा टेस्ट सक्तीच्या
खेळाडूंच्या निवडीचे निकष ठरविताना एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या फिटनेसच्या घसरणाऱया दर्जामुळे क्षेत्ररक्षणावर परिणाम होत असल्याने बहुचर्चित ठरलेली यो-यो चाचणी (20 मी. अंतर वाढत्या वेगाने धावणे) पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विराट कोहली-रवी शास्त्री यांच्या कालावधीत ही चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. तो आता खेळाडूंसाठी पुन्हा महत्त्वाचा निकष ठरणार आहे. ‘यो-यो व डेक्सा चाचणी आता निवडीसाठी महत्त्वाचा निकष असेल आणि मध्यवर्ती खेळाडूंसाठी तो लागू केला जाईल,’ असे बीसीसीआयने स्पष्ट केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या वेबसाईटनुसार, ‘डेक्सा स्कॅनमध्ये हाडांची घनता मोजता येते. या स्कॅनमधून हाडांबाबत महत्त्वाचा तपशील मिळू शकतो. त्यात ओस्टिओपोरोसिस (ठिसूळता) व प्रॅक्चर्स यांचा समावेश आहे. याशिवाय या तपासणीत शरीराची रचना, चरबी व स्नायूंच्या ताकदीचा तपशीलही मिळू शकतो.’
नवोदित खेळाडूंसाठी देशी क्रिकेट खेळणे आवश्यक
अनेक नवोदित खेळाडू आयपीएलमधून पैसा मिळविण्यासाठी रेड बॉलपेक्षा व्हाईटबॉल क्रिकेटला जास्त प्राधान्य देताना दिसून येतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी बीसीसीआयने त्यांना आता देशी क्रिकेटमध्ये खेळणे सक्तीचे केले आहे. त्यात सहभागी झाल्यानंतरच त्यांचा राष्ट्रीय संघातील निवडीसाठी विचार केला जाणार आहे.
वर्कलोडसाठी एनसीए पँचायजींशी समन्वय साधणार
वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 20 खेळाडूंना आयपीएलमध्ये रोटेट केले जाणार आहे का, याबद्दल बीसीसीआय म्हणते की, वर्ल्ड कपची तयारी व एफटीपी लक्षात घेऊन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आयपीएल प्रँचायजींशी समन्वय साधेल आणि त्या खेळाडूंवर नजर ठेवेल.
दीपक चहर, बुमराह, शमी यासारखे महत्त्वाचे खेळाडू वरचेवर अनफिट ठरत असल्याने अशा खेळाडूंना आयपीएलमध्ये विश्रांती दिली जावी, यावर विवाद सुरू झाला होता. बीसीसीआयने या पर्यायाचा जरूर विचार करावा, असे माजी प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी सूचित केले होते. क्रिकेटचे प्रमाण भरपूर वाढले असल्याने प्रत्येकाने किती खेळावे याचा समतोल राखला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.