कचऱ्याच्या समस्येबाबत बैठकीत जोरदार चर्चा : मंत्र्यांनी दिला आणखी तीन डेपोसाठी जागा शोधण्याचा आदेश
बेळगाव : शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच पडून आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहराच्या प्रवेशद्वारांसमोरच मोठमोठे कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत हे कचऱ्याचे ढीगच करत आहेत, असा आरोप नगरसेवक रवी साळुंखे यांनी केला. यावर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. याचबरोबर लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही कचऱ्याचा हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे तो सोडविण्यासाठी पाऊल उचला. महत्त्वाचे म्हणजे सध्या एकच कचरा डेपो आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून चार कचराडेपो तयार करण्यासाठी आराखडा तयार करा, अशी सूचना करण्यात आली आहे. शहराचे जे प्रवेशद्वार आहे, त्या ठिकाणीच कचरा साचून आहे. त्यामुळे बेळगाव स्मार्टसिटी नाही कचरासिटी आहे का? असा प्रश्न पडत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता साऱ्यांवर आली आहे. याचबराब्sार शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच पडून राहतात. त्यामुळे जनतेला आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. तेव्हा आम्ही स्मार्टसिटी म्हणून राहात असताना कचऱ्याची समस्या ही गंभीर बनत चालली असून, त्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी नगसेवकांबरोबरच नागरिकांनी केली आहे.
कंत्राटी पद्धतीने कचरा उचलचे काम
कचरा उचल करण्यासाठी बिव्हीजी कंपनीला टेंडर देण्यात आले होते. मात्र ती कंपनी फिरकलीच नाही. त्यामुळे आम्ही त्यांना चारवेळा नोटीस दिल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नोटीस देवून पुढे काय करणार? असा प्रश्न पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला. सध्या कंत्राटी पद्धतीने कचरा उचल करण्याचे काम दिले गेले आहे. महापालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून केवळ 147 जण कार्यरत आहेत. इतर 551 जण हे कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर नगरसेवक रवी साळुंखे यांनी या सर्वच कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. ही कुत्री अनेकांवर हल्ला करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांवर अधिक हल्ले ही कुत्री करत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली. यावर महापालिकेचे आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांनी आम्ही कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी कंपनीला टेंडर दिला आहे. शहरामध्ये जवळपास 20 हजार मोकाट कुत्री आहेत. त्यांची नसबंदी करणेच गरजेचे आहे. इतर कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर कायदेशीर अडचणी देखील त्यांनी यावेळी मांडल्या.
न्यायालयाची स्थगिती असताना इमारती पाडविल्या
पहिले रेल्वेगेट जवळील 48 गाळे न्यायालयाची स्थगिती असताना पाडविण्यात आले आहेत. न्यायालयाची प्रत देवूनही अधिकाऱ्यांनी हे गाळे पाडविले आहेत, असा आरोप गाळेधारकांनी केला. याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी करून संबंधितांना न्याय देण्याची सूचना केली आहे. यावर गाळेधारकांनी हे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून न्यायालयाचा देखील अवमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
100 रुपयांच्या बॉन्डवरील घरे नियमित करा
गोर-गरीब जनतेने 100 रुपयांच्या बॉन्डवर जागा घेऊन घरे बांधली आहेत. मात्र त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. तेव्हा अक्रम-सक्रम योजनेंतर्गत सदर घरे नियमित करून द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही घरे नियमित करण्यासाठी इतर परवानग्या देण्यासाठी महापालिकेतील अधिकारी 25 हजार रुपये मागणी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
शहापूर नाथ पै परिसराकडे दुर्लक्ष
शहापूर येथील नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल आणि परिसरात एलईडी पोल उभे करण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून हे खांब उभारले असून, अजूनही त्या ठिकाणी पथदीप बसविण्यात आले नाहीत, असा आरोप नगरसेवक रवी साळुंखे यांनी केला. उभे केलेले एलईडी पोल खराब झाले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या परिसरातील कचऱ्याची वेळेत उचल होत नाही, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
गाळ्यांचे त्वरित वितरण करा
नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कल रस्त्यावर महापालिकेने गाळ्यांची उभारणी केली आहे. मात्र हे गाळे सध्या रिकामे असून या ठिकाणी भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. भाजी व इतर विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा नाही. या परिसरातील झाडांचीही कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे भाजी विव्रेत्यांना उन्हात बसूनच भाजी विक्री करावी लागत आहे. तेव्हा तातडीने या गाळ्यांचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
इंदिरा कॅन्टीन कार्यान्वित करा
गोर-गरीब जनतेला कमी दरामध्ये नास्टा व जेवणाची सोय करण्याचे पाऊल काँग्रेस सरकाने उचलले होते. इंदिरा गांधी यांच्या नावाने हे कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. मात्र बरेच कॅन्टीन बंद आहेत. अशा तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा सर्व कॅन्टीन सुरू ठेवा, अशी सूचना महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. शहरामध्ये 6 इंदिरा कॅन्टीन आहेत. त्यामधील चार कॅन्टीन बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. मात्र अधिकाऱ्यांनी ही सर्व कॅन्टीन सुरू आहेत, असे सांगितले. या ठिकाणी उत्तम दर्जाचे जेवण आणि नास्टा उपलब्ध करा, असे देखील यावेळी सांगण्यात आले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची कंत्राटदारांकडून पिळवणूक
अॅड. आर. पी. पाटील यांनीही कचऱ्याच्या विरोधात अधिकाऱ्यांचा गलथान कारभार पालकमंत्र्यांसमोर मांडला. स्वच्छता कर्मचारी हे पहाटेपासून काम करत असतात. मात्र कंत्राटदार त्यांची पिळवणूक करत असतात, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तेव्हा कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य ते पाऊल उचला, अशी मागणी करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी व महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कचरा डेपोसाठी आणखीन तीन जागा निवडा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे एकूण चार कचरा डेपो होतील, असे सांगून आताच कामाला लागा, अशी सूचना करण्यात आली.