गदायुद्धमध्ये झळकणार सुमित शिरगुरकर : नितीन शिरगुरकर यांची निर्मिती
बेळगाव : धरती पे पाप का बोज बढता है, तब वो कम करने के लिये योद्धा जनम लेता है, असाच एक गदाधारी योद्धा चित्रपटाच्या माध्यमातून बेळगावकरांच्या भेटीला येत आहे. ना बंदुक ना बॉम्ब तर केवळ ‘गदा’ हाती घेऊन तो शत्रूंना नामोहरम करणार आहे. ‘गदायुद्ध’ असे या चित्रपटाचे नाव असून बेळगावचा नवोदित अभिनेता सुमित शिरगुरकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत चमकणार आहे.
जेव्हा सामान्यांना कोणत्याही विकृतीशी लढता येत नाही तेव्हा असेच एखादे विराट स्वरुप आपल्या मदतीला यावे, असे त्यांना वाटते आणि त्याच कारणासाठी हनुमान हा आपला वाटतो. पुराण कथांमध्ये हनुमानाच्या अफाट शक्तीचे अनेक दाखले आहेत. आपल्या शक्तीचा गर्व असणाऱ्या भीमाचे अंजनेय पुत्र हनुमानाने गर्वहरण केले. आपल्या शक्तीचा उपयोग लोकांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी कर हा सल्ला हनुमानाने भीमाला दिला आणि त्याच्या हाती गदा सोपविली. पुढे याच गदेच्या साहाय्याने भीमाने युद्ध करून शत्रूंना गारद केले. गदायुद्धमध्ये हिरोच्या हातातसुद्धा गदा आहे आणि सर्व विकृतींवर मात करताना तो गदायुद्ध करून त्यांचा नि:पात करतो. हा चित्रपट काळी जादु, जादुटोणा, करणीबाधा या सर्व अंधश्रद्धांवर प्रहार करणारा आहे. या जगात एक चैतन्य शक्ती निश्चितच आहे. फक्त आपण तिचा उपयोग कसा करतो हे महत्त्वाचे आहे. अलीकडे पॉझिटिव्ह ऊर्जा आणि निगेटिव्ह ऊर्जा हे शब्द सतत कानावर येतात. या ऊर्जा व्यक्तीवर निश्चितच परिणाम करतात. अगदी विज्ञान, तंत्रज्ञान प्रगत झाले तरी आजही घरोघरी मुलांची दृष्ट काढण्यात येते. त्यांच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू नये, हा त्यामागचा हेतू आहे. माणसाने सतत सकारात्मक असायला हवे हे नक्की. परंतु कधी कधी त्याला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो, ही लढाऊ वृत्ती आपण गमावता कामा नये. गदायुद्ध नेमका याच विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे.
खरे तर या नेहमीच्या जगण्यापलीकडेही एक जग नक्कीच आहे. चैतन्य, मन आणि बुद्धी या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्यांचे अस्तित्व तर जाणवतेच. आजच्या आधुनिक जगात भौतिकाच्या पलीकडील जगाचा म्हणजेच कॉन्टम फिजीक्सचा अभ्यास सुरू आहे. गदायुद्धमध्ये नेमका हाच धागा पकडण्यात आला आहे. पुराणकथा व गुन्हेगारी विश्व यांच्या भोवती हा चित्रपट फिरतो. या चित्रपटात सुमितचे नाव भीम आहे आणि अंजनेय म्हणजेच हनुमान विकृतींशी लढण्यासाठी भीमाला गदा देतो आणि ब्लॅक मॅजिक करून सामान्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या, त्यांना त्रासात टाकणाऱ्या विकृतींचा नाश भीम गदायुद्धाने करतो. हे गदायुद्ध मोठे रंजक ठरले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण केले गेलेले युद्धाचे प्रसंग, भानामती करणी करणारे ढोंगी बुवा आणि त्यांच्याशी लढणारा भीम असे प्रसंग प्रभावी ठरल्याने चित्रपट आपली उत्कंठा वाढविणार आहे हे निश्चित. चित्रपट विकृत प्रवृत्तींवर प्रहार करणारा असला तरी त्यामध्ये मनोरंजनाचा मसाला पुरेपूर भरला आहे. धन्या व ऐश्वर्या या नायिकांनी ती बाजू उचलून धरली आहे. या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण मनाली, बेंगळूर, तामिळनाडू येथे झाले आहे. परंतु बेळगाव आणि परिसरातील लोकांसाठी विशेष बाब म्हणजे बरेचसे शुटिंग आंबोली घाटातही झाले आहे. आज विज्ञान प्रगत झाले असले तरी असे अघोरी प्रकार करणारे लोक आहेत. मात्र, मानव आणि विकृती यातील संघर्षामध्ये विकृतीला नेहमीच हार मानावी लागली आहे. सर्व शक्तीमान जर कोण असेल तर तो निसर्ग आहे, हा संदेश चित्रपट देतो.
- प्रमुख भुमिकेत-सुमित शिरगुरकर
- चित्रपट-गदायुद्ध
- निर्माता-नितीन शिरगुरकर
- संगीत-सालोमन
- फोटोग्राफी-सुरेश बाबु