वृत्तसंस्था/ रोहतक
वेगवान गोलंदाज आकाशदीप सिंगच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात हरियानाचा 1 डाव आणि 50 धावांनी दणदणीत पराभव करत बंगालने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात आकाशदीप सिंगने 10 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगालने पहिल्या डावात 419 धावा जमविल्या. त्यानंतर हरियानाचा पहिला डाव 163 धावात आटोपला. बंगालकडून त्यांना फॉलोऑन मिळाला. हरियानाने दुसऱया डावात 206 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 1 डाव आणि 50 धावांनी गमवावा लागला. बंगालला या सामन्यात 7 गुण मिळाले.
या स्पर्धेतील ओडिशा आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात उत्तर प्रदेशला 3 तर ओडिशाला 1 गुण मिळाला. ओडिशाने पहिल्या डावात 226 धावा जमविल्यानंतर उत्तर प्रदेशने पहिल्या डावात 362 धावा झळकविल्या. ओडिशाने दुसऱया डावात 4 बाद 335 धावांपर्यंत मजल मारली. या स्पर्धेत हिमाचल प्रदेश व नागालँड तसेच बडोदा आणि उत्तराखंड यांच्यातील सामनेही अनिर्णित राहिले आहेत.