27 जानेवारीपासून पुन्हा होणार सुरू
वृत्तसंस्था/ जम्मू
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा बुधवार हा 131 वा दिवस होता. जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये अतिवृष्टीमुळे ही यात्रा रोखण्यात आली आहे. भूस्खलन तसेच अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करत दिली आहे. प्रजासत्ताक दिनी यात्रेचे आयोजन होणार नाही, 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसच्या वेळापत्रकानुसार 25 जानेवारी म्हणजेच बुधवारी यात्रा रामबन येथून सुरू झाली, खोबाग येथे ही यात्रा पोहोचणे अपेक्षित होते, परंतु अतिवृष्टीमुळे ही यात्रा काही काळासाठी रोखण्यात आली. भारत जोडो यात्रा 30 जानेवारी रोजी श्रीनगर येथे पोहोचणार असून तेथेच यात्रेचा समारोप होणार आहे.
काँग्रेसने 7 सप्टेंबर रोजी ही यात्रा सुरू केली होती. भारत जोडो यात्रा तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमार्गे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा 3,570 किलोमीटर लांबीची आहे. या यात्रेद्वारे काँग्रेस पक्ष 372 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करत आहे.