पाकिस्तानमध्ये सध्या अन्नधान्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे, असे दिसून येत आहे. गव्हाचे पीठ मिळविण्यासाठीही नागरिकांना मोठीच धडपड करावी लागत असून वेळप्रसंगी त्यासाठी मारामाऱयाही होत आहेत, असे तेथून येणाऱया वृत्तांवरुन समजते. आधीच हा देश विदेशी कर्जांच्या विळख्यात सापडला आहे. राजकीय अस्थिरता या देशाच्या पाचवीलाच पुजली आहे. या देशातील लोकशाहीही व्यवहारतः केवळ नावापुरती आहे. भरीस भर म्हणून महागाईने कहर केला असून त्यामुळे लोकांचा जीव मेटाकुटीस आला असल्यास नवल नाही. काही दिवसांपूर्वी तेथील अत्यावश्यक वस्तूंचे दर किती प्रमाणात आहेत, याची माहिती प्रसिद्ध झाली होती. गॅसचा सिलिंडर 10 हजार रुपये, कांदा 500 रुपये किलो, गव्हाचे पीठ किंवा आटा 300 रुपये किलो, साखरेची टंचाई अशी दयनीय स्थिती झाली आहे. गॅसच्या सिलिंडरची कमतरता असल्याने प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून गॅसची विक्री होत असल्याचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध झाले होते. या पिशव्या म्हणजे चालते बाँब आहेत, अशी टीका तेथील वृत्तपत्रेच करीत आहेत. नागरिकही दुसरा कोणताही पर्याय नसल्याने अशा धोकादायक मार्गांचा अवलंब करीत आहेत. गेल्या वर्षी आपला आणखी एक शेजारी देश श्रीलंकेचीही हीच स्थिती झाली होती. तेथेही महागाईचा महास्फोट झाला होता. आजही श्रीलंकेतील परिस्थिती पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. जनक्षोभाच्या भीतीपोटी त्या देशाच्या प्रत्यक्ष अध्यक्षांवर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली होती. मात्र, ही अशी भुकेकंगाल अवस्था होण्याची दोन्ही देशांमधील कारणे मात्र भिन्न भिन्न आहेत. पाकिस्तानपुरते सांगायचे तर, या परिस्थितीसाठी तेथील राज्यकर्ते प्रामुख्याने कारणीभूत आहेत. सरकार आणि प्रशासन यांच्यात होणारा तेथील लष्कराचा हस्तक्षेपही अप्रत्यक्षरित्या या स्थितीला कारणीभूत आहे. पाकिस्तान आपली बहुतेक शक्ती भारताचा द्वेष करण्यात आणि भारताची हानी घडवून आणण्यात व्यतीत करतो. भारताला अपशकून करण्यासाठी पाकिस्तानने चीनशी संधान बांधले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशा भावनेने पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी चीनला आपल्या देशात खोलवर प्रवेश करु दिला. चीनच्या महत्वाकांक्षी महामार्ग योजनेत स्वतःचा बळी जाऊ दिला. चीन हा अलीकडच्या काळात पाकिस्तानचा सावकार झाला आहे आणि या सावकाराच्या मर्जीप्रमाणे हालचाल करणे आता त्याला भाग आहे. श्रीलंकेनेही चीनशी चुंबाचुंबी करुन तोंड पोळून घेतले आहे. आपल्या उत्तरेकडचा नेपाळही चीनधार्जिणा झालेला आहे. एकंदर पाहता असे दिसून येते की ज्या देशांनी चीनचे नको इतके साहाय्य घेतले आहे, त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थितीही हाताबाहेर गेल्याचे समजून येते. इम्रानखान यांच्या हातातून सत्ता गेल्यानंतर बराच काळ लोटला असतानाही परिस्थिती आहे तशीच आहे. या साऱया स्थितीची पायाभरणी अगदी पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच झाली आहे. तेव्हापासून गेली 75 वर्षे भारतद्वेष हाच पाकिस्तानचा मूलाधार राहिला आहे. असेही बोलले जाते की, पाकिस्तानने जर भारतद्वेष सोडला तर त्या देशामधील आंतर्विरोध विकोपाला जाऊन त्या देशाचे तुकडे होतील. भारताची हानी घडविण्यासाठी पाकिस्तानने थेट युद्ध छेडण्यापासून ते धार्मिक दहशतवादाचा उच्छाद काश्मीर आदी ठिकाणी घडविण्यापर्यंत सर्वकाही करुन पाहिले. अद्यापही हेच होत आहे. धर्मांधतेवर पाकिस्तानचा पूर्ण विश्वास आहे. आज जगभरात कोणत्याही देशात नसेल इतक्या संख्येने धार्मिक दहशतवादी गट पाकिस्तानात आहेत. या गटांचा वचक मोठा असून सरकारही त्यांचे आश्रित असल्याप्रमाणे वागते. अशा वातावरणात सुयोग्य आर्थिक धोरण आखणे, ते लागू करणे, देशात उद्योगधंद्यांची वाढ करणे, शेतीकडे लक्ष देणे इत्यादी कर्तव्यांचे तेथील प्रशासनाला काहीही महत्त्व वाटत असल्याचे दिसत नाही. सातत्यपूर्ण आणि विवेकी धोरणाच्या अभावी अनेक उद्योग दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. काही भारतीय उद्योजकांनी पाकिस्तानात गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूकही धोक्यात आली आहे, अशी वृत्ते तेथील वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होतात. त्यामुळे पाकिस्तानच्या दुर्दशेचा फटका भारतालाही काही प्रमाणात बसत आहे. एकंदर या बजबजपुरीत दहशतवाद्यांचे चांगलेच फावते हे वेगळे सांगावयाची आवश्यकता नाही. अफगाणिस्तानशीही पाकिस्तानचे पटत नाही. या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये नेहमी चकमकी घडत आहेत. अफगाण दशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये घुसलेल्या असून, ज्या दहशतवादाचा उपयोग पाकिस्ताकडून भारताची हानी करण्यासाठी झाला, तो दहशतवाद त्याच देशावर उलटला आहे, हे स्पष्ट आहे. अशा अतिरेकी वातावरणाचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर झाला आहे, यात संशय नाही. या सापळय़ातून सुटण्यासाठी आता पाकिस्तान सौदी अरेबिया आणि नाणेनिधीसारख्या ंसंस्थांसमोर आर्थिक पॅकेज पदरात पाडून घेण्यासाठी नाक घासत आहे. ते पॅकेज मिळाले तरी जोपर्यंत आतूनच स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत काहीही सुधारणा होणे अशक्यच आहे. पाकिस्तानने आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बाहेरुन कोणीही काहीही साहाय्य पेले तरी ते निरर्थक आहे. भारताने पाकिस्तानमील या परिस्थितीकडे डोळय़ात तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेला हा देश आता नैराश्यापोटी अधिकाधिक धर्मांध बनण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात दहशतवाद वाढविण्यासाठी त्याच्याकडून शक्य तितके प्रयत्न होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आपल्या सीमारेषांचे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषांचे आणि सीमेनजीक असलेल्या आस्थापनांचे संरक्षण भक्कमपणे करण्याची व्यवस्था आपल्या देशाने केली पाहिजे. पाकिस्तान त्याच्या कर्माची फळे भोगत आहेच. तेथील आगीची धग आपल्याला लागू नये म्हणून दक्ष राहणे आवश्यक आहे.
Previous Articleभारताची मालिकेत विजयी आघाडी
Next Article पहिला रोबोट वकील सादर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.