नेहरुनगरमधील 500 किलो कचरा विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने इंदिरा कँटीनजवळ प्रकल्प
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरातील कचऱयाचे विघटन करून ओल्या कचऱयावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता तीन ठिकाणी विविध क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यापैकी 500 किलो कचरा विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नेहरूनगर येथील इंदिरा कँटीनजवळ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शहरातील कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी तुरमुरी डेपो येथे कचरा टाकला जातो. त्याठिकाणी कचऱयाचे विघटन करून ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. तर घरोघरी जावून कचऱयाची उचल केली जाते. तरीदेखील कचरा विघटन करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होत आहे. तसेच जमा झालेल्या कचऱयाची उचल करून तुरमुरी डेपोत नेण्यासाठी वाहतुकीकरिता मोठय़ा प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठीच वर्षाला 25 कोटीहून अधिक खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे होणाऱया खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी जावून जमा केला जाणारा कचरा वेगवेगळय़ा स्वरुपात जमा करण्याची सूचना केली आहे. तसेच वॉर्डस्तरीय प्रकल्प राबवून सुका आणि ओला कचऱयावर प्रक्रिया करण्याची सूचना नगरविकास खात्याने केली आहे. त्यामुळे मांसविपेते, हॉटेल व्यावसायिक, भाजी मार्केट आणि मोठय़ा प्रमाणात कचरा उत्पादन करणाऱयांना महापालिकेने नोटीस बजावून कचऱयाची विल्हेवाट लावण्याची सूचना केली आहे.
एपीएमसीत वीजनिर्मितीचा प्रकल्प
तसेच शहरात जमा होणाऱया ओल्या कचऱयावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने बायोगॅस प्रकल्प राबविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. याकरिता एपीएमसी, खासबाग कचरा डेपो आणि नेहरूनगर इंदिरा कँटीनशेजारी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. यापैकी एपीएमसी येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून याठिकाणी पाच टन कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नेहरूनगर येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पात दररोज 500 किलो कचऱयावर प्रक्रिया करून स्वयंपाकाचा गॅस तयार केला जाणार आहे. या गॅसचा वापर इंदिरा कँटीनच्या स्वयंपाकासाठी केला जाणार आहे. नेहरूनगर येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.