वृत्तसंस्था/ लाहोर
बिस्माह मारूफने पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. जवळपास सहा वर्षे तिने संघाचे नेतृत्व केले. मारूफची कर्णधार म्हणून शेवटची निवड दक्षिण आफ्रिकेतील ‘आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी झाली. तेथे पाक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही आणि कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या सामन्यासह गटातील चारपैकी तीन लढती त्यांनी गमविल्या.
भारताविरुद्ध पाकिस्तानने 149 धावांपर्यंत मजल मारण्यात या 31 वर्षीय खेळाडूने मोलाची भूमिका बजावली होती. ती 68 धावांवर नाबाद राहिली होती. पण भारताने हे लक्ष्य सहा चेंडू बाकी असताना सात गडी राखून पार केले होते. अनुभवी फलंदाज असलेली मारूफ आतापर्यंत 124 एकदिवसीय सामन्यांत आणि 132 ‘टी20’ लढतींत खेळली आहे. यापैकी 34 एकदिवसीय सामन्यांत (16 विजय) आणि 62 टी20 सामन्यांत (27 विजय) तिने संघाचे नेतृत्व केले आहे.
मात्र बिस्माह खेळाडू म्हणून निवडीसाठी उपलब्ध राहील, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. सप्टेंबर, 2017 मध्ये बिस्माहला पाकिस्तानच्या क्रिकेटमधील सर्व प्रकारांतील महिला संघाची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कर्णधार म्हणून तिची जागा घेणाऱया खेळाडूची निवड योग्य वेळी जाहीर केली जाईल, असे पीसीबीने म्हटले आहे. माझ्या देशाचे कर्णधारपद मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती आणि मी एका मेहनती क्रिकेटपटूंच्या संघाचे नेतृत्व केले. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते, अशी प्रतिक्रिया बिस्माहने व्यक्त केली आहे.