गुप्तहेरगिरी प्रकरणी पाक पत्रकाराच्या गौप्यस्फोटाचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशाशी गद्दारी केली आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भारतात 2007 ते 2010 या काळात पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी भारतात गुप्तहेरगिरी केली होती. या गुप्तहेरगिरीत त्यांना त्यावेळी देशाचे उपराष्ट्रपती असणाऱया हमीद अन्सारी यांचे साहाय्य झाले होते, असा आरोप आहे. मिर्झा यांनी स्वतःच या बाबींचा गौप्यस्फोट केल्याने भाजपने काँगेसकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
मनमोहनसिंग पंतप्रधान असताना 2007 ते 2010 या 3 वर्षांच्या काळात नुसरत मिर्झा यांनी भारताला पाच वेळा भेट दिली होती. या भेटींमध्ये भारतातल्या तत्कालीन उच्चपदस्थांशी संधान बांधून त्यांनी अनेक गोपनीय कागदपत्रे मिळविली होती. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या वतीने मिर्झा यांनी ही गुप्तहेरगिरी केली होती, असे मिर्झा यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
अन्सारींनी केला विश्वासघात
भारताच्या जनतेने भोळेपणाने हमीद अन्सारी यांना आदर दिला. त्यांचा मान ठेवला. यामुळेच ते उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकले. मात्र, त्यांनी भारताशी प्रामाणिकपणा दाखविला नाही. त्यांनी पाकिस्तानला साहाय्य करुन भारताची बाजू कमजोर करण्याचा प्रयत्न केला. भारताची गुप्त माहिती पाकिस्तानी पत्रकारासमोर उघड केली. पाक पत्रकार मिर्झा यांनी ही बाब उघड केल्यानंतर आता काँग्रेसने मौन धारण केले आहे. मिर्झा यांनी केलेल्या आरोपांचा इन्कार काँगेसने न केल्याने काँगेसचेच बिंग फुटले आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. त्यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले हेते.
संपुआच जबाबदार
अन्सारी यांच्या गद्दारीला त्यावेळचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जबाबदार आहे. अन्सारी यांच्या अशा काळय़ा कृत्यांची माहिती असूनही या सरकारने त्यांना उपाध्यक्षपदी दुसऱयांदा निवडून दिले. मिर्झा यांनी अन्सारी यांच्याकडून गुप्त माहिती मिळविली आणि तिचा उपयोग भारत विरोधी कृत्ये करण्यासाठी केला. मिर्झा पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयकडे ही माहिती पोहचवित असूनही त्यावेळचे संपुआ सरकार स्वस्थ राहिले होते, असा आरोप भाजपने केला आहे.