आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपतर्फे ‘जागर मुंबईचा’ अभियानाला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वांद्रे येथून सुरूवात करण्यात आली. मुंबई महापालिकेत सलग 25 वर्ष शिवसेनेने सत्ता भोगली. त्यातील 20 वर्ष भाजप शिवसेनेसोबत पालिकेत सत्तेत होती. आता मुंबई महापालिकेच्या निमित्ताने मुंबईत हिंदु-मुस्लिम असे धार्मिक तुष्टीकरण व मराठी-गुजराती या मुद्यांवर आता राजकीय पक्ष वाद निर्माण करतील. त्याचे परिणाम आगामी काही दिवसात दिसतीलच पण भाजपकडून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत असून भाजपची सगळी मंडळी रोज उठून शिवसेनेवर व उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठा राजकीय संघर्ष पहायला मिळेल असे वाटत असतानाच, भाजपने शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. या जागेवर ऋतुजा लटके यांना मिळालेले मताधिक्य आणि नोटाला मिळालेले मतदान बघता भाजपने जरी उमेदवारी अर्ज मागे घेत आपण महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत असल्याचे सांगितले असले, तरी कालच्या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या बोलक्या असून भाजपने नोटाच्या आडून राजकारण केल्याचा थेट आरोप ठाकरे गटाने भाजपवर केला आहे. लटके यांच्या विजयानंतर तर मुंबई भाजप अध्यक्ष ऍड.आमदार आशिष शेलार यांची प्रतिक्रिया खुप काही सांगून जाते. भाजपच्या मदतीमुळे लटके यांचा विजय झाला, भाजपने निवडणूक लढविली असती तर यांचा पराभव निश्चित होता. आता एकीकडे राजकीय परंपरा जपताना उमेदवारी मागे घेण्याची घोषणा करायची आणि निकालानंतर पुन्हा राजकारण करायचे? दुर्देवाने महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी सध्या इतक्या खालच्या स्तराला गेली आहे की लोकांना आता कोणताच पर्याय सक्षम पर्याय दिसत नसल्याचे द्योतक म्हणून की काय मतदान यंत्रातील नोटा या पर्यायाचा प्रभाव वाढताना दिसत आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. लोकांनी ज्या उमेदवाराला निवडून दिलेले असते तो उमेदवार म्हणून निवडणूक एका युती किंवा आघाडीकडून लढतो. राज्यात सत्तेत वेगळ्याच पर्यायांसोबत जातो आणि पुन्हा राज्यात सत्ता परिवर्तन करताना वेगळ्याच विचाराने जातो आणि विशेष म्हणजे उध्दव ठाकरेंच्या काळात तीन पक्ष सत्तेवर होते तर आता दोन पक्ष म्हणजे सोशल मीडियावर आलेल्या एका विनोदाप्रमाणे मतदारांनी कोणालाही मतदान केलेले असले तरी त्यांचे मत वाया गेलेले नाही. सर्व पक्ष सत्ताधारी होऊन गेले. त्यामुळे अशी राजकीय परिस्थिती पाहता आता आगामी काळात नोटांचा प्रभाव चांगलाच वाढणार हे सध्याच्या राजकारणातील अस्थैर्य आणि विश्सासघातकी राजकारणामुळे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले, त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. विद्यमान सरकारने महाविकास आघाडी सरकारवर आरोप करायचा आणि महाविकास आघाडी सरकारने शिंदे-फडणवीस सरकारवर मात्र या आरोप प्रत्यारोप आणि राजकारणापायी राज्याची जी बदनामी झाली. त्यामुळे राज्याच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा परिणाम होणार यात शंका नाही. आगामी मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे, भिवंडी परिसरात गेल्या दोन दिवसात केलेला दौरा आणि या दौऱयाच्या निमित्ताने बावनकुळे यांनी दिलेले आव्हान तसेच ठाण्यातील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱयांनी ठाणे कोणालाही आंदन देऊ नका. युती करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा अशी केलेली मागणी लक्षात घेता शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे. यापूर्वी भाजपने कधी ही शिवसेनेसोबत असताना अशा प्रकारची भाषा केली नाही. मात्र आता एकनाथ शिंदे गटालासोबत घेऊन भाजप एकीकडे शिवसेना ठाकरे गटाला आव्हान देत आहे तर दुसरीकडे शिंदे गटालाही राजकीय धक्के देण्याची रणनीती खेळत असल्याचे दिसत आहे..
मुंबई भाजपकडून जरी जागर मुंबईचा करण्यात येत असला तरी महाराष्ट्र भाजपच्यावतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ निहाय आढावा बैठक घेण्यास सुरूवात झाली असून, दुसरीकडे शिवसेनेचे दोन गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, हेवे-दावे करताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटासोबत भाजप युती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगताना भाजप विधानसभेला 48 पैकी किमान 45 जागा तर विधानसभेच्या 200 जागा जिंकणार असल्याचे बावनुकळे यांनी सांगितले. तर 2024 ची आगामी निवडणूक येईपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करतील असे बावनकुळे यांनी बोलताना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. राज्यातील काँग्रेसचे आमदार फुटुन भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करतील तर फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनतील असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेंद्र सरकार मोठय़ा गोष्टी करत असते. या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणूका जाहीर होऊ शकतात, असा अंदाज असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तांतर झालेल्याला 3 महिने होऊन गेले. अद्यापही राज्यातील सरकारवर टांगती तलवार आहे. शिंदे गटासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चु कडु आणि भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा यांच्यातील वाद तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार करता शिंदे गटातील आमदारांमध्ये कोणाचा समावेश होणार याबाबत उत्सुकता आहे, आता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार का? आणि कोणा कोणाचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील महिन्यात नागपूर येथे राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. 2 वर्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने राज्यात सण, उत्सव जसे दणक्यात साजरा झाले, त्याप्रमाणे नागपूरचे अधिवेशनही तीन आठवडे चालवण्याचा सरकारचा मानस असल्याचे समजते.
प्रवीण काळे