महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन
बेळगाव : महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाची जाग आणून देऊन त्यांना मराठी भाषिकांच्या वेदनांची जाणीव करून देण्यासाठी मंगळवार दि. 28 रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन होणार असून यावेळी मोठ्या संख्येने सीमावासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले. कोणतेही पाठबळ नसताना सीमाभागातील मराठी भाषिक आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा देत आहेत. न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील आंदोलने करत आपले हक्क मागितले जात आहेत. परंतु ज्या महाराष्ट्रात सामील व्हायचे आहे तेथून मात्र तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलनाची धार कमी होत आहे. महाराष्ट्र सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी मंगळवारी मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन केले जाणार आहे.
मुंबई येथील आंदोलनासाठी सोमवारी सकाळपासून कार्यकर्ते रवाना होणार आहेत. आंदोलनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची नावनोंदणी करण्यात आली असून मुंबई परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पनवेल, वाशी, वडाळा यासह इतर भागात राहण्याची व्यवस्था म. ए. समितीने केली आहे. कार्यकर्ते दुचाकी, चार चाकी वाहने त्याचबरोबर बस व रेल्वेने मुंबईला पोहोचणार आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना आझाद मैदानात जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चलो मुंबई हा नारा देण्यात आल्यापासून बेळगाव, खानापूर, निपाणी या परिसरात जागृती केली जात आहे. कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचारात वाढ होत असून महाराष्ट्र सरकारने याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी मराठी भाषिकांमधून होत आहे. त्यामुळे होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार आहे.