वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत आणि बांगलादेश हे चालू आठवड्याच्या अखेरीस दिल्ली येथे द्विवार्षिक सीमा-स्तरीय चर्चा करणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांदरम्यान सीमापार गुन्ह्यांशी निगडित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) 15 सदस्यीय शिष्टमंडळ शनिवारी नवी दिल्लीत पोहोचणार आहे. बीजीबीचे शिष्टमंडळ हे बीएसएफच्या शिष्टमंडळासोबत 11 जून ते 14 जूनदरम्यान होणाऱ्या 4 दिवसीय चर्चेत सामील होणार आहे. बीजीबीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मेजर जनरल एकेएम नजमुल हसन करतील. तर बीएसएफ शिष्टमंडळाचे नेतृत्व महासंचालक सुजॉय लाल थाउसेन करणार आहेत. या दोन्ही शिष्टमंडळांमध्ये संबंधित देशांच्या गृह मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि अमली पदार्थ विरोधी शाखेचे अधिकारी सामील असणार आहेत. दोन्ही देशांमधील सीमा स्तरीय चर्चेची ही 53 वी बैठक असणार आहे. दोन्ही देशांदरम्यान सीमा व्यवस्थापन, गुन्ह्यांची चौकशी आणि समन्वित सीमा व्यवस्थान योजना लागू करण्यावरून चर्चा होणार आहे. बीजीबी आणि बीएसएफ यांच्यातील परस्पर विश्वास वाढविणे आणि वर्तमान संबंध अधिक मजबूत करण्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर विचारविनिमय होणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.