पर्यावरण दिन असल्याने अनुमती नाकारली, एफआयआरमध्ये गंभीर आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या प्रस्तावित अयोध्या सभेला प्रशासनाने अनुमती नाकारली आहे. मात्र, सिंग यांनी स्वत:च रॅली पुढे ढकलल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी शारीरिक शोषण केल्याचे आरोप केले असून त्यांच्याविरोधात दोन एफआयआर सादर करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे.
सिंग यांनी महिला कुस्तीपटूंना सहेतुक शारीरिक स्पर्श केला. त्यांचा श्वासोच्छवास तपासण्यासाठी त्यांना शर्ट काढण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे शारीरिक संबंधांची इच्छा व्यक्त केली, असे आरोप काही महिला कुस्तीपटूंनी केले आहेत. दिल्ली पोलीस या आरोपांची चौकशी करीत आहेत. अद्याप चौकशी सुरु असून तिचा अंतिम अहवाल ती पूर्ण झाल्यानंतर सादर करण्यात येईल. तोपर्यंत कोणालाही क्लिनचिट देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
खाप पंचायतीचा इशारा
9 जूनपर्यंत ब्रिजभूषण सिंग यांना अटक झाली नाही, तर दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खाप पंचायतीने दिला आहे. 1983 मध्ये क्रिकेटचा विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघानेही कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्याना न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
आरोप पुन्हा नाकारले
ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप पुन्हा नाकारले आहेत. आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी अयोध्येतील महासभा आपण स्वत:च काही दिवसांसाठी पुढे ढकलली असल्याची माहिती दिली. त्यांच्यावर आरोप असल्याने रॅली सध्या होणार नाही. मात्र, काही दिवसांनंतर सभा घेण्यात येईल असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले. त्यांच्याविरोधातील चौकशी लवकरात लवकर पूर्ण केली जावी, अशी मागणीही त्यांच्या काही समर्थकांनी केली आहे.
कुस्तीपटूंना न्याय मिळाला पाहिजे…
महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाला पाहिजे. तथापि, त्यासाठी आधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. सरकार या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशी करत आहे. या प्रकरणी न्याय व्हावा आणि सत्य उघड व्हावे, ही साऱ्यांचीच मागणी आहे. या प्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्या आधारावर चौकशी होत आहे, असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व मागण्या मान्य केल्या
केंद्र सरकारने कुस्तीपटूंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. समिती स्थापन करण्याची त्यांची मागणी त्वरित मान्य करण्यात आली. खेळाडू असो किंवा कोणतीही महिला असो, तिच्यावर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळणे आवश्यकच आहे. तसेच तो वेगवान पद्धतीने मिळाला पाहिजे, यात शंका नाही. मात्र, त्यासाठी कायद्याचा मार्ग अवलंबावा लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच
महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात चालविलेले आंदोलन सुरुच आहे. न्याय मिळेपर्यंत ते सुरु राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. आपल्याला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आपला उत्साह वाढला असून शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी व्यक्त केला आहे.