वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रेनकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत कांस्य पटकाविले.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात मलेशियाच्या ऍरोन चिया आणि सो वुई इक या जोडीने सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचा 20-22, 21-18, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा सामना 77 मिनिटे चालला होता. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरी बॅडमिंटन प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या सातव्या मानांकित जोडीला सलग सहाव्यांदा मलेशियाच्या या जोडीकडून हार पत्करावी लागली आहे. 2011 नंतर या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारताला दुहेरीमध्ये हे पहिलेच पदक मिळाले आहे. तत्पूर्वी म्हणजे 2011 साली झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कास्यपदक मिळविले होते.