निवारण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा राज्य रयत संघटना-हरित सेनेचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर वसाहतीमधील समस्येचे निवारण करण्यास बुडा प्रशासनाला अपयश आले आहे. येथील गटारीचे बांधकाम आणि रस्त्यांचा विकास करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण 20 वर्षांपासून व्यवस्थित नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे येथील समस्यांचे निवारण तातडीने करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
बुडाच्यावतीने रामतीर्थनगर वसाहत निर्माण करण्यात आली होती. प्रारंभी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. पण त्यानंतर देखभाल करण्याकडे बुडाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे गटारींची दुरवस्था झाली आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. स्वच्छता वेळेवर केली जात नसल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. समस्यांचे निवारण करावे, अशा मागणीचे निवेदन बुडाकडे करण्यात आले होते.
10 वर्षे झाली तरी समस्यांचे निवारण नाहीच
याबाबत 2012 मध्ये शासनाकडे पाठपुरावा करून समस्यांचे निवारण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रामतीर्थनगर परिसराची पाहणी करून तीन महिन्यात समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला 10 वर्षे पूर्ण झाली तरी समस्यांचे निवारण झाले नाही. बुडाकडून विकासकामांच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे.
निधीचा दुरुपयोग
वसाहती निर्माण करण्याच्या नावावर केवळ दिखाऊपणा करून निधीचा दुरुपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबरोबरच रामतीर्थनगरमधील समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.