आई-मुलाचा समावेश : राज्यात हिंसाचार सुरूच
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये मागील महिन्यापासून मैतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष सुरूच आहे. काही भागात अजूनही तणाव असून नव्या हिंसाचारामध्ये जमावाने आई आणि मुलासह एकूण तिघांना जिवंत जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे. तिघांनाही ऊग्णवाहिकेतून उपचारासाठी ऊग्णालयात नेत असताना वाटेत सुमारे 2000 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला करत वाहन पेटवून दिले. ही घटना रविवारी घडली असून त्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांकडून माहिती जारी करण्यात आली. या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी फक्त हाडे सापडल्याची माहिती देण्यात आली. आगीत मृत्युमुखी पडलेली महिला आणि तिचा मुलगा मैतेई समुदायातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिलेने काही वर्षांपूर्वी कुकी समाजातील तरुणाशी विवाह केला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतरही राज्यात परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. काही लोकांनी शस्त्रे आत्मसमर्पण केली आहेत. सरकार शांततेसाठी खूप प्रयत्न करत असले तरी परिस्थिती सुधारलेली नाही. समाजातील अविश्वास आणि द्वेष आणखी वाढला असून काही भागात हिंसाचाराची धग कायम असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.